मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्षाने ‘अश्वमेध’ दौडवत 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला आहे. मुंबईच्या ‘किल्ल्या’पासून ते पुण्यापर्यंत आणि नाशिकपासून ते विदर्भापर्यंत भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, विजयाचा हा आनंद साजरा करतानाच नितेश राणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद उफाळून आला असून, थेट मुख्यमंत्र्यांना त्यांचे ‘कान टोचावे’ लागले आहेत.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना उद्देशून हास्य करताना दिसले. निकालानंतर ठाकरे पिता-पुत्रांना डिवचण्याच्या नादात राणे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि तो अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या; काही समर्थकांनी याला ‘चांगले’ म्हटले, तर अनेकांनी राजकीय संस्कृतीला न शोभणारे कृत्य म्हणून त्यावर ताशेरे ओढले.
हेही वाचा: BMC Election Result Analysis: ठाकरेंच्या हातातून मुंबई का निसटली? 'ही' धक्कादायक कारणे ठरली टर्निंग पॉइंट
नितेश राणे यांच्या या ‘हास्यकल्लोळाची’ दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. विजयाचा उन्माद नको, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून दिला आहे. फडणवीस म्हणाले, “विजयाचा उत्सव जरूर साजरा करा, गुलालाचा मान राखा, पण त्यात उन्माद असता कामा नये. जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्त होतो, तेव्हा त्यामागे काहीतरी भक्कम पार्श्वभूमी आणि राजकीय सभ्यता असली पाहिजे.” मुख्यमंत्र्यांचा हा ‘डोस’ थेट नितेश राणे यांच्यासाठीच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाकरे-राणे संघर्षाची जुनी ‘पार्श्वभूमी’
ठाकरे आणि राणे घराण्यातील राजकीय वैर हे महाराष्ट्राला नवीन नाही. कोकणच्या मातीतील हे दोन वाघ एकमेकांसमोर आले की राजकीय ठिणग्या पडणारच, हा इतिहास आहे. याच इतिहासाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी सुचवले की, टीका करताना किमान पातळी ओलांडली जाऊ नये. “राजकारणात हार-जीत होत असते, पण विजयाने पाय जमिनीवरच हवेत,” असा सुसंस्कृत संदेश फडणवीसांनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे.
एकीकडे 29 महानगरपालिकांमध्ये भाजपने 1400 हून अधिक जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला आहे, तर दुसरीकडे अंतर्गत शिस्त राखण्यासाठी नेतृत्वाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागत आहे. ‘विजयाचा अतिरेक हा पराभवापेक्षाही घातक ठरू शकतो’ या उक्तीनुसार, फडणवीसांनी राणेंना दिलेली ही समज म्हणजे केवळ एका नेत्याला दिलेला इशारा नसून, संपूर्ण कार्यकर्त्यांना दिलेला ‘संयम पाळण्याचा’ संदेश आहे.
आता नितेश राणे मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यानंतर आपली सोशल मीडियावरील आक्रमकता कमी करणार की, ‘राणे शैली’ तशीच कायम राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात “विजयाचा गुलाल आणि टीकेचा गुलाल” या दोन्ही गोष्टींची जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: Pune Election Result 2026: पुणे महापालिकेत कौटुंबिक राजकारणाचा बोलबाला; एकीकडे सख्खे भाऊ तर दुसरीकडे सासू-सून