Thursday, March 12, 2026 10:33:44 PM

Maharashtra Weather Update: ढगाळ वातावरण, वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

maharashtra weather update ढगाळ वातावरण वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

Maharashtra: राज्यातील हवामानाने गेल्या काही दिवसांत अक्षरशः उलथापालथ केली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उकाडा आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू असून, अनेक भागांत वातावरणात सतत चढ-उतार जाणवत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो. ढगाळ हवामानामुळे उष्णता अधिक जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Jayant Patil: 'राज्यपालांच्या अभिभाषणात अजितदादांचा साधा उल्लेखही नाही...'; जयंत पाटलांनी सरकारला दाखवला आरसा

मागील तीन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांना फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक वाया गेले आहे. विशेषतः यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. दिवसाच्या वेळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस अशा परिस्थितीमुळे सर्दी, ताप आणि व्हायरल संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत. दुसरीकडे, मुंबईसारख्या महानगरात वायू प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

तापमानातही लक्षणीय तफावत दिसून आली आहे. काही ठिकाणी किमान तापमान घटले असून तर काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: BMC Budget 2026: सत्ताबदलानंतरचा मोठा आर्थिक निर्णय; महापालिका ठेवींचा निधी थेट विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणार

शेतकरी वर्गाकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट ओढावले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

एकंदरीत, पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामानातील अस्थिरतेमुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे. हवामान खात्याच्या पुढील अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री