Sunday, March 08, 2026 11:56:07 PM

Maharashtra Weather Today: फेब्रुवारीनेच काढला घाम! एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा, नागरिक त्रस्त

ढगाळ वातावरण असूनही उकाडा वाढत असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

maharashtra weather today फेब्रुवारीनेच काढला घाम एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा नागरिक त्रस्त

पुणे: निसर्गाचा लहरीपणा आता विज्ञानाच्या पलीकडे जाऊन सामान्यांच्या अंगाची लाहीलाही करू लागला आहे. ज्या दिवसांत गुलाबी थंडीची ऊब अनुभवायची, त्याच फेब्रुवारीच्या उत्तरार्धात चक्क मे महिन्याचा तडाखा बसू लागला आहे. राज्यात सध्या 'न थंडी, न पाऊस' अशा विचित्र वातावरणाने ठाण मांडले असून, कडक ऊन आणि ढगाळ हवामानाच्या कात्रीत नागरिक सापडले आहेत. "सकाळचे कोवळे उन्ह" आता दुपारी विस्तवासारखी चटका देऊ लागली असून, वाढत्या उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. हवामान विभागाने आज (ता. 27) तापमानाचा हा पारा अधिकच चढणार असल्याचा इशारा दिला आहे.

हवामानातील या नाट्यमय बदलांमागे भौगोलिक चक्रे कारणीभूत आहेत. गुजरातवर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आणि दक्षिण कर्नाटकात 1.5 किलोमीटर निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती राज्याची शांतता भंग करत आहे. त्यातच दक्षिण कर्नाटकपासून थेट मराठवाड्यापर्यंत पसरलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने आर्द्रता वाढली आहे. परिणामी, आभाळात ढगांची दाटी होते, पण पाऊस मात्र पडत नाही. उलट सूर्याची उष्णता ढगांमुळे जमिनीतच कोंडली जात असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. राज्याच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी झालेली वाढ ही आगामी कडक उन्हाळ्याची धोक्याची घंटा मानली जात आहे.

गुरुवारी संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सोलापूर आणि तामिळनाडूच्या एरोडे येथे 36.6 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. एकीकडे सोलापूर 'हॉटस्पॉट' ठरत असताना, दुसरीकडे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 11.3 अंश सेल्सिअस  या राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. म्हणजेच, महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठी तफावत पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या अलवारमध्ये देशातील नीचांकी 10 अंशांची नोंद झाली असली, तरी महाराष्ट्रात मात्र सूर्याचा प्रकोप अधिक तीव्र होताना दिसत आहे.

हेही वाचा: Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआत रस्सीखेच; ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी दिग्गजांची मोर्चेबांधणी, 'ही' नावं चर्चेत

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील स्थिती

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरने उच्चांक गाठला असून सांगली (35.7 अंश सेल्सिअस ) आणि सातारा (35.2 अंश सेल्सिअस ) येथेही उन्हाच्या झळा तीव्र आहेत. कोल्हापूरचा पारा 34.3 अंश सेल्सिअसवर असून महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही 28.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव 36 अंशांवर पोहोचले असून मालेगाव 35.6 आणि अहिल्यानगर 34.8 अंशांवर आहे. नाशिकमध्ये 33.3 अंशांसह उन्हाचा चटका जाणवत असून धुळ्यात किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा तापलेला पारा

मराठवाड्यात परभणी 34.1 अंश सेल्सिअस , छत्रपती संभाजीनगर 33.9 अंश सेल्सिअस आणि धाराशिव 33.6 अंशांवर आहे. कोकण किनारपट्टीवर सांताक्रूझ (32.1), डहाणू (32.3) आणि रत्नागिरीत 33.6 अंश सेल्सिअस तापमानामुळे दमट हवामान आणि उकाडा असह्य झाला आहे. विदर्भातही उन्हाचा तडाखा वाढला असून सरासरी तापमान 36 अंशांच्या आसपास दिसत आहे. पुण्यातील किमान तापमान 15.5 अंश सेल्सिअस  नोंदवण्यात आले असून दुपारी पुण्यातील रस्तेही उन्हामुळे तापू लागले आहेत.

येत्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत अंशतः ढगाळ हवामान राहील, मात्र उन्हाचा चटका कमी होणार नाही. "आधीच उन्हाचा तडाखा, त्यात ढगांचा वेढा" अशी स्थिती असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे शीतपेयांच्या बाजारात तेजी आली असली, तरी निसर्गाचे हे बदललेले रूप शेती आणि आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा: BMC Mayor Ritu Tawde Watch : मुंबईच्या महापौरांकडे 1 कोटी रूपयांचं घड्याळ? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण, सत्य काय?


सम्बन्धित सामग्री