मुंबई: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचा एक आगळावेगळा लपंडाव पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीचे दिवस असतानाच अचानक किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, थंडी आता गायब होऊ लागली आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे पहाटे दाट धुक्याची चादर आणि रात्रीच्या वेळी असह्य उकाडा, असे दुहेरी चित्र राज्यात निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज म्हणजेच 23 जानेवारी रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा इशारा (Rain Alert) दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, कोकणातील पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या सहा जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. यामुळे 'आभाळ' दाटून आल्याने शेतकरी वर्गाची काहीशी चिंता वाढली आहे.
हेही वाचा: Driving License Banned : काय राव...सलग पाच वेळा हे नियम मोडल्यावर RTO तुमचा सत्कार करेल का?; आता होणार थेट लायसन्सच जप्त
तापमानाचा पारा 10 अंशांच्या पार
गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात झालेली घट आजही कायम असून थंडीचा जोर ओसरला आहे. विशेषतः नाशिक, धुळे आणि निफाड सारख्या ठिकाणी, जिथे पारा पाच ते सहा अंशांपर्यंत खाली जात असे, तिथे आता किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे. यामुळे असह्य गारठा संपून वातावरणात दमटपणा आणि उकाडा जाणवू लागला आहे. पुढील दोन दिवस तापमानातील हे चढ उतार असेच कायम राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
'कधी ऊन, कधी पाऊस' नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका आणि रात्री उकाडा अशा विचित्र हवामानामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "हवापालट झाला की दुखणी मागे लागतात," हे खरंय. सध्या घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत असून, डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
बळीराजा पुन्हा संकटात
अवकाळी सदृश परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावला आहे. रब्बी हंगामातील पिके विशेषतः गहू, हरभरा आणि द्राक्ष बागांवर या ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतीचे अर्थचक्र पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा: Solapur ZP Election: करमाळ्यात निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले; शिवसेना जिल्हाप्रमुख आणि निवडणूक अधिकारी भिडले; व्हिडिओ आला समोर