मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ जाणवल्यानंतर थंडी पुन्हा जोर धरताना दिसत आहे. अनेक भागांत रात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत असून, किमान तापमान सातत्याने खाली येत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टी भागांतही थंडीची पुन्हा हजेरी लागली आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राज्यातील तापमान हळूहळू घसरत असून पुढील काही दिवस गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि पूर्व विदर्भासाठी हवामान विभागाकडून थंडीचा इशारा दिला आहे. नागपूरमध्ये मागील 24 तासांत तापमान 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले असून, हे या वर्षीचे सर्वात कमी तापमान मानले जात आहे. नव्या आठवड्यात तापमानात आणखी दोनअंश सेल्सिअसपर्यंत कमी होवू शकते, असा तातडीचा सूचनावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे नागपूर आणि परिसरात कडाक्याची थंडी वाढण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
हेही वाचा: Esha Deol Post For Dharmendra : 'मी तुमचा वारसा अभिमानाने आणि आदराने पुढे चालू ठेवण्याचे वचन देते'; ईशानं व्यक्त केली धर्मेंद्रप्रती भावना
वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागांत सकाळी दाट धुके पसरण्याची शक्यता असून, दृश्यमानता कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील मार्गांवर वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे अपघाताची शक्यता वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कोकणात दिवसाच्या वेळी आर्द्रता जाणवली तरी रात्री गारठा लक्षणीय वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत तापमानात झपाट्याने घट होईल, त्यामुळे किनारपट्टी भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवेल.
दरम्यान, देशभरातील हवामानातही मोठा बदल दिसत आहे. पश्चिमी वादळ सक्रिय झाल्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशसाठी पाऊस व बर्फवृष्टीचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पर्वतीय भागांत हिमवादळासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, पर्यटनस्थळांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात हवामानातील या अचानक बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना थंडीपासून योग्य संरक्षण घेण्याचा, तसेच दाट धुक्यात वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत हवामान सतर्कतेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: Sunil Sahu Inspiring Story: दोन्ही हात गमावले, पण जिद्दीच्या जोरावर 18 पदके जिंकणारे सुनील साहू यांचा यशस्वी प्रवास