सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राजकीय वातावरण तापलेले असतानाच भारतीय जनता पक्षाने गोटातील 'बंडखोरांना' आणि 'फितुरांना' मोठा धक्का देत पक्षात शिस्तीचा बडगा उगारला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या आणि छुपी मदत करणाऱ्या तब्बल 23 पदाधिकाऱ्यांवर भाजपने निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, "शिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा थेट इशाराच पक्षाने यातून दिला आहे.
पक्षाच्या अधिकृत ध्येयधोरणांना हरताळ फासत, ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत किंवा जे उघडपणे विरोधकांना रसद पुरवत होते, अशांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाची घोषणा केली. या सर्वांना तब्बल सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. असे नेतृत्व हे पक्षासाठी नेहमीच घातक ठरते, हे ओळखून निवडणुकीच्या ऐन धामधुमीत भाजपने हे धाडसी पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
या कारवाईमध्ये केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर पक्षाचे वजनदार आणि जुने जाणते चेहरेही रडारवर आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती वंदना किनळेकर, माजी सभापती शर्वाणी गावकर आणि राजन चिके यांसारख्या प्रमुख नेत्यांचा यात समावेश आहे. पक्षाच्याच नेत्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये होती, ज्याला या कारवाईने आता पूर्णविराम मिळाला आहे. तालुकानिहाय करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असला, तरी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही 'स्वच्छता मोहीम' आवश्यक असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Sanjay Raut : मुंबईच्या महापौर वादावर राऊतांकडून भाजप आणि शिंदेंवर घणाघात, नेमकं काय घडलं?
निलंबित करण्यात आलेल्या 23 जणांची यादी खालीलप्रमाणे आहे:
कणकवली तालुक्यातील राजन बाळकृष्ण चिके (फोंडा), श्रीमती साक्षी संदीप नाईक, श्रीमती सुनीता कमलाकर भिसे, श्रीमती सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस, दोडामार्गचे राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (कोनाळकट्टा), आणि अनिरुद्ध फाटक यांचा समावेश आहे. वेंगुर्ला तालुक्यातील श्रीमती सुजाता अजित पडवळ (तुळस), श्रीमती वंदना किरण किनळेकर (म्हापण), विजय महादेव रेडकर (मातोंड), जनार्दन रुक्मानंद कुडाळकर (आडेली) आणि विजय वासुदेव नाईक (आडेली) यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
सावंतवाडी तालुक्यातूनही अनेक मोठ्या नावांना डच्चू देण्यात आला आहे, ज्यात डायगो उर्फ मायकल फ्रान्सिसी डिसोजा (कोलगाव), जितेंद्र पांडुरंग गावकर (माजगाव), योगेश अशोक केणी, स्वागत रघुवीर नाटेकर व नितीन एकनाथ राऊळ (तिघेही इन्सुली), उल्हास उत्तम परब (सातार्डा), श्रीमती शर्वाणी शेखर गावकर (आरोंदा), आणि श्रीमती स्नेहल संदीप नेमळेकर (आरोंदा) यांचा समावेश आहे. तसेच कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील श्रीमती सोष्मिता अरविंद बांबर्डेकर, योगेश राजाराम तावडे आणि नेरूरचे रुपेश अशोक पावसकर यांच्यावरही पक्षाने कठोर कारवाई केली आहे.
निवडणुकीच्या या रणसंग्रामात भाजपने घेतलेला हा निर्णय म्हणजे भविष्यातील रणनीतीचा एक भाग मानला जात आहे. "आधी निष्ठा, मग पद" हे तत्त्व अधोरेखित करत पक्षाने कार्यकर्त्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले आहे. या मोठ्या सस्पेन्शन कारवाईमुळे आता बंडखोरांचे राजकीय भविष्य अंधांतरी झाले असून, उर्वरित निवडणुकीत याचा फायदा नेमका कसा होतो आणि नुकसान कोण सहन करणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा: Raosaheb Danve: मोदींचा 'तो' शब्द, पवारांची अट, पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग तीनवेळा; दानवेंकडून मोठा गौप्यस्फोट