Friday, December 05, 2025 01:30:11 AM

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका?; जवळच्या सहकाऱ्यांवर संशय, दोघे पोलिसांच्या ताब्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

manoj jarange patil  मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका जवळच्या सहकाऱ्यांवर संशय दोघे पोलिसांच्या ताब्यात

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाने राज्य हादरवून सोडलं… पण आता या आंदोलनाच्या प्रमुख चेहऱ्यालाच संपवण्याचा भीषण कट रचल्याचं समोर आलं आहे! होय, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी ठरवली गेल्याची माहिती समोर आली आहे. बीड शहरात झालेल्या काही गुप्त बैठकीत हा कट रचला गेला असल्याचे पोलिसांना कळताच, त्यांनी रात्रीतच कारवाई करत दोन जणांना पकडलं आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कटात जरांगे पाटलांचाच एक जुना सहकारी सामील असल्याचा संशय आहे! पोलिसांनी चौकशीसाठी बीडमधून दादा गरुड आणि अमोल खुणे या दोघांना ताब्यात घेतलं असून, यापैकी अमोल खुणे हा पूर्वी जरांगे पाटलांच्या टीममध्ये काम करत होता, अशी माहिती समोर येत आहे.

राजकीय नेत्याचं नाव समोर येणार का?

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याने हा कट रचल्याची कबुली दिली आहे! कोण तो नेता? त्यामागचा उद्देश काय होता? एवढं मोठं षड्यंत्र का आणि कोणासाठी? हे प्रश्न आता राज्याच्या राजकारणाला पेटवणार आहेत.

कसा उघड झाला कट?

जरांगे पाटलांच्या विश्वासू सहकाऱ्याला, गंगाधर काळकुटे, या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. यानंतर, विशेष पथकाने रात्री उशिरा बीडमध्ये गुप्त कारवाई केली आणि दोन संशयितांना जेरबंद केलं. दरम्यान, घटनेचं गांभीर्य ओळखून मनोज जरांगे पाटील स्वतः रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना तात्काळ आणि कठोर कारवाईची विनंती केली आहे.

आता तपास कोणत्या दिशेने जाणार? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चौकशीतून काही राजकीय धक्के बसणारे खुलासे होण्याची शक्यता आहे. या कटामागे आणखी किती जणांचा हात आहे, निधी कुठून आला आणि उद्देश काय होता याचा शोध घेतला जात आहे.

राज्यभर खळबळ आणि संताप

मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना ठार मारण्याचा कट उघड झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. एकीकडे जनतेत जरांगे यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी वेळीच कारवाई करून एक मोठा धोका टळल्याचं मानलं जातंय.

आता सर्वांच्या नजरा आहेत त्या एकाच प्रश्नावर “हा कट नेमका कुणी रचला?” पोलिसांच्या पुढील चौकशीतून याचं उत्तर समोर आलं, तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येणार नाही.

हेही वाचा: Sanjay Raut Health Update : हात लिहिता राहिला पाहिजे... थेट रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट

 

सम्बन्धित सामग्री