Maharashtra Weather Update: गेल्या महिन्यात अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम वाढवला. आता राज्यातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मान्सूनचा पाऊस हळूहळू कमी होत असल्याचे दिसून आले आहे. हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सूनच्या परतीच्या या प्रवासामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अजूनही होऊ शकतो.
यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला
यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला होता. आता हवामान विभागाने परतीचा पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज वर्तवला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधून पुढील 24 तासात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana : योजनेचे पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींची कसरत; ओटीपीकरता चढताहेत उंचच्या उंच डोंगर
पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यातून मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आलेले नाहीत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे.
यावर्षी ठरलेल्या वेळेच्या आठवडाभर आधीच सुरू झालेला नैऋत्य मौसमी पाऊस 24 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दोन आठवडे आधीच तो महाराष्ट्रात पोहोचला. जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होतं मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला होता. आता हवामान विभागाने परतीचा पाऊस लवकरच सुरू होईल असे सांगितले आहे.