Sunday, March 08, 2026 10:48:31 PM

Aditya Thackeray: नवरंग होळी मंडळ ते बाजार गल्ली! वरळीत आदित्य ठाकरेंची हजेरी; कोळी बांधवांच्या आग्रहाखातर धरला ठेका

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात पारंपरिक शिमगोत्सव आणि पूर्व-होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

aditya thackeray नवरंग होळी मंडळ ते बाजार गल्ली वरळीत आदित्य ठाकरेंची हजेरी कोळी बांधवांच्या आग्रहाखातर धरला ठेका

मुंबई: समुद्राच्या लाटांचा आवाज आणि कोळीगीतांचा साद... जेव्हा मुंबईच्या किनारपट्टीवर शिमगोत्सवाचे रंग उधळले जातात, तेव्हा महानगराचा वेग मंदावतो आणि परंपरांचा सोहळा प्रज्ज्वलित होतो. कोकणच्या लाल मातीतील शिमगा जितका प्रसिद्ध आहे, तितकीच मुंबईच्या कोळीवाड्यांमधील होळी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. यंदाही वरळी कोळीवाड्याने शेकडो वर्षांची परंपरा जपत होळीच्या एक दिवस आधीच उत्सवाचे रणशिंग फुंकले. या पारंपरिक उत्सवात स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः सहभागी होऊन कोळी बांधवांचा उत्साह द्विगुणित केला.

'कोळीवाड्याची शान आणि परंपरेचा मान' राखत वरळीतील गल्लीगल्लीत होळीची तयारी करण्यात आली होती. नवरंग होळी मंडळ आणि बाजार गल्लीतील भव्य होळ्यांनी परिसराचे वातावरण भारावून टाकले होते. विशेष म्हणजे, वरळीकरांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरे यांनी या उत्सवात हजेरी लावली. भगवे फेटे, ढोल-ताशांचा गजर आणि 'होळी रे होळी, पुरणाची पोळी' अशा घोषणांनी वरळीचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.

हेही वाचा: Iran Israel War: तेहरान हादरले; इस्रायलने हल्ला करून खामेनेईंपाठोपाठ 'या' मोठ्या नेत्यालाही संपवलं, मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका सुरूच

यावेळी केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर एका घरच्या सदस्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला. कोळी बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला, तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला. कोळी संस्कृतीतील हा आपुलकीचा ओलावा पाहून स्वतः आदित्य ठाकरेही भारावून गेले होते. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सुख-दुखात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

वरळी कोळीवाड्याची एक विशेष ओळख म्हणजे येथील 'पूर्व-होळी' परंपरा. मुख्य होळीच्या एक दिवस आधीच येथे सणाची लगबग सुरू होते. कोळी महिलांचे पारंपरिक वेशभूषेतील नृत्ये आणि दर्यावर्दी पुरुषांचा उत्साह हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. वरद वरळीकर यांच्यासारख्या स्थानिक तरुणांनी आणि जुन्या जाणत्यांनी एकत्र येत या उत्सवातील शिस्त आणि भव्यता टिकवून ठेवली आहे. मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आजही कोळीवाड्यांनी अस्मिता कशी जपली आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा सोहळा आहे.

सध्या महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक पातळीवर अनेक घडामोडी घडत असताना, होळीच्या निमित्ताने सर्व हेवेदावे विसरून जनता एकत्र आल्याचे चित्र सुखद आहे. मुंबईच्या कोळीवाड्यांमधून सुरू झालेला हा शिमगोत्सव आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पसरत आहे. वरळीतील हा जल्लोष केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून, तो मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या संस्कृतीचा विजय आहे. 'भारताचा पोशिंदा' जसा शेतकरी आहे, तसाच 'मुंबईचा रक्षक' कोळी बांधव आहे, आणि त्यांच्या या सणाने मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हेही वाचा: Modi Calls Netanyahu इराण-इस्रायल संघर्षात पंतप्रधान मोदींची एन्ट्री; नेतन्याहूंना थेट फोन, काय झाली चर्चा?


सम्बन्धित सामग्री