Kirit Somaiya : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या, 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'ठाकरे बंधू आतापासूनच आपल्या पराभवाची पार्श्वभूमी तयार करत आहेत,' अशी बोचरी टीका सोमय्या यांनी केली आहे.
'वोट जिहाद'वरून मतदारांना आवाहन
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच यंदा अधिक गडद झाला असताना सोमय्या यांनी 'वोट जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "ठाकरे सेना मतदारांना वोट जिहादच्या नावाखाली भडकवण्याचे काम करत आहे. मात्र, मुंबईतील सुज्ञ नागरिक या प्रवृत्तीला ओळखून आहेत आणि ते मतदानातून चोख प्रत्युत्तर देतील. मुंबईकर वोट जिहाद करणाऱ्यांना आणि त्याला खतपाणी घालणाऱ्यांना या निवडणुकीत निश्चितच धडा शिकवतील."
हेही वाचा - PADU Machine: PADU मशीन म्हणजे काय? राज ठाकरेंसह विरोधकांचा आक्षेप का, आणि बीएमसी निवडणुकीत नेमका कधी होणार वापर?
सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका
राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या आरोपांचा समाचार घेताना सोमय्या यांनी स्पष्ट केले की, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. निवडणूक आयोगावर टीका करणे हा आता पराभव स्वीकारण्याचा एक प्रकार झाला आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना सोमय्यांनी विचारले की, "प्रचार थंडावल्यानंतर जेव्हा राऊत यांचे बंधू मतदारांच्या गाठीभेटी घेत होते, तेव्हा त्यांना निवडणूक नियमांची आठवण का आली नाही? केवळ सोयीनुसार आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे."
हेही वाचा - BMC Election 2026 : 'ठाकरे बेस्ट' पोस्ट विरुद्ध 'महादेव' कार्ड; निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी रंगली सोशल मेडियावर चर्चा
घुसखोरांच्या मुद्द्यावरून कोंडी
सोमय्या यांनी ठाकरे बंधूंच्या भाषणांमधील त्रुटींकडे लक्ष वेधले. "दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या संपूर्ण प्रचारसभेत मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या संख्येवर एकदाही अवाक्षर काढले नाही. व्होट बँकेच्या राजकारणासाठी त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे," असा आरोप त्यांनी केला. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज असताना, सोमय्यांच्या या विधानामुळे निवडणुकीच्या मैदानात धार्मिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता 16 जानेवारीला येणाऱ्या निकालात मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.