Thursday, May 22, 2025 10:08:13 PM

शक्तिपीठ महामार्गावर ग्रामस्थांचा विश्वास महत्त्वाचा; सिंधुदुर्गात बेकायदेशीर कृत्यांना थारा नाही – नितेश राणे

शक्तिपीठ महामार्ग ग्रामस्थांच्या विश्वासाशिवाय सुरू होणार नाही, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली; विरोधकांवरही साधला निशाणा.

शक्तिपीठ महामार्गावर ग्रामस्थांचा विश्वास महत्त्वाचा सिंधुदुर्गात बेकायदेशीर कृत्यांना थारा नाही – नितेश राणे

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या महामार्गाचे काम ग्रामस्थांच्या विश्वासाशिवाय सुरू होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. गावोगावी जाऊन प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधणार असून, त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री नितेश राणे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत आमचं धोरण स्पष्ट आहे. विकास हवा पण कोणत्याही गावकऱ्याच्या इच्छा विरोधात नाही. आम्ही संबंधित प्रशासनाला सूचित केले आहे की पर्यायी मार्ग शोधा जेणेकरून कुणीही बाधित होणार नाही. यासंदर्भात अजून सरकारच्या पातळीवर अंतिम निर्णय झालेला नाही.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडलं. विरोधक जिल्ह्याचं वातावरण बिघडवत आहेत. त्यांनी जर काही सूचना असतील तर त्या माझ्याकडे मांडाव्यात, जिल्ह्याची बदनामी करू नये. विकासाच्या आड येणाऱ्या कोणालाही जिल्ह्यात थारा नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा:जातनिहाय जनगणना झाली तर जरांगेंच्या आंदोलनाची गरज भासणार नाही; काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची भूमिका

कासारडे मायनिंगच्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, ग्रामस्थ आमच्या सोबत आहेत. मायनिंगविरोधात तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे मांडाव्यात. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी माझी आहे. पुरावे द्या, दोषींना घरी पाठवण्याचं काम मी करीन. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार पारदर्शक आहे आणि कोणाचीही गय केली जाणार नाही.

मंत्री राणेंनी अमली पदार्थ, अवैध धंदे याविरोधातही ठाम भूमिका घेतली असून, कोणतीही बेकायदेशीर कृती जिल्ह्यात सहन केली जाणार नाही, असे त्यांनी बजावले.

तसेच त्यांनी सिंधुदुर्गातील 'आका शोध' मोहिमेवरही भाष्य केलं. या जिल्ह्यात उबाठा सेनेचा आका नेमका कोण? विनायक राऊत की वैभव नाईक? या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असा थेट सवाल करत त्यांनी राजकीय घमासानालाही सुरुवात केली.

या संपूर्ण संवादातून मंत्री नितेश राणेंनी विकासावर भर दिला असून, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचं प्रशासन हेच त्यांचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शक्तिपीठ महामार्ग असो वा मायनिंगचा मुद्दा निर्णय लोकांच्या विश्वासावरच घेतले जातील, असा विश्वास त्यांनी दिला आहे.
 


सम्बन्धित सामग्री