कर्जत: राज्य सरकारमधील अंतर्गत वाद उघड होत असताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थखात्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, सरकारकडे पैसेच शिल्लक नाहीत, त्यामुळे अनेक योजना थांबल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, या सरकारने हवेत स्वप्नं दाखवली, पण ती पूर्ण करता येत नाहीत. यासाठी संपूर्ण सरकारच जबाबदार आहे.
संजय शिरसाठ यांनी लाडक्या बहिणीसाठी सव्वाचारशे कोटी रुपये अर्थ खात्याने वर्ग केल्याची कल्पनाही आपल्याला नसल्याचं सांगितल्याने सरकारच्या आर्थिक निर्णयांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक न्याय खाते बंद करण्याचा मुद्दा उपस्थित करत, अर्थखात्याच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले होते.
या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी म्हटले की, आज शिरसाठ बोलले, उद्या इतर मंत्रीही बोलतील. सरकारमध्ये ताळमेळ नाही. शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, या मुद्द्यावर रोहित पवारांनी अजित पवार यांचं नाव घेणं टाळल्याचं जाणवतं.
हेही वाचा:ठाणे जिल्ह्यात 16 शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाचा पालकांना सजगतेचा इशारा
कर्जमाफीबाबतही सरकारवर निशाणा
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. अजित पवार यांना कर्जमाफीबाबत विचारल्यावर त्यांनी कोणतं आश्वासन दिलं? असा प्रतिप्रश्न केला होता. यावर रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अनेक महायुती नेत्यांनी निवडणूक प्रचारात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग आता जर ते पूर्ण करता येत नसेल, तर केवळ एक नेता नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात सूचना
येत्या 6 मे रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातही रोहित पवारांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आम्हीही या बैठकीसाठी आग्रही होतो. 31मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रीशताब्दी जन्मोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी शेती व पिण्याच्या पाण्याच्या विविध योजनांना मंजुरी मिळावी. याशिवाय, प्राण्यांशी संबंधित योजनांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.
राजकीय गणित बिघडतंय?
राज्यातील मंत्री एकमेकांवर टीका करत असल्याने, सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्न निर्माण होत आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, पूर्वी फडणवीस व शिंदे वेगवेगळी मतं मांडायचे, आता मंत्रीच एकमेकांवर बोलत आहेत. म्हणजे सरकारमध्ये वादच वाद आहेत.
एकूणच, रोहित पवार यांनी संपूर्ण सरकारवर जबाबदारी ढकलत अजित पवार यांच्याबाबत बोलणं टाळलं, हे या घडामोडीत विशेष लक्षवेधी ठरत आहे.