Satara Zilla Parishad Election: सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या कायमच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जातात. सहकार, कृषी, ग्रामीण विकास आणि स्थानिक नेतृत्व यामुळे साताऱ्यातील सत्ताकारण राज्यपातळीवरील राजकारणावरही प्रभाव टाकत असते. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत आतापर्यंत कोणत्या पक्षाचं किंवा युती-आघाडीचं प्राबल्य राहिलं आहे, याकडे प्रत्येक निवडणुकीवेळी विशेष लक्ष दिलं जातं.
२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली होती. एकूण ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ३९ जागांवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. ग्रामीण भागातील प्रभाव, सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं यामुळे राष्ट्रवादीचं वर्चस्व त्या निवडणुकीत ठळकपणे दिसून आलं.
त्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. इतर पक्षांनी मिळून ७ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला केवळ २ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष उमेदवारांनीही २ जागांवर विजय मिळवला होता. विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे यांना एकही जागा मिळवता आली नव्हती. या निकालामुळे सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं होतं.
पंचायत समित्यांच्या बाबतीतही २०१७ मध्ये साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी बाजी मारली होती. जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील एकूण १२८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ७६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला होता. काँग्रेसला १६, भाजपाला १२ आणि शिवसेनेला ६ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष उमेदवारांनी २ जागांवर यश मिळवलं होतं. या निकालांनी ग्रामीण साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं होतं.
साताऱ्याचा राजकीय इतिहास पाहिला तर हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यशवंतराव चव्हाण यांच्या वारशामुळे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला येथे दीर्घकाळ जनाधार मिळत राहिला. मात्र अलीकडच्या काळात भाजपाने देखील काही भागांत आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांमध्ये थोडी वाढ झाली असून राजकीय लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, युती-आघाड्यांतील फूट, स्थानिक प्रश्न आणि विकासकामांचा हिशेब या सगळ्याचा परिणाम यावेळी निकालावर होणार आहे.
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलं, तरी यावेळी तेच चित्र कायम राहणार की विरोधी पक्ष राष्ट्रवादीला आव्हान देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचा फैसला मतदार लवकरच करणार आहेत.