Sunday, March 08, 2026 11:41:21 PM

Shirdi Saibaba Temple: साई दरबारातून महत्त्वाची अपडेट; 'या' दिवशी साईबाबांचे दर्शन घेता नाही येणार, 'हे' कारण आलं समोर

या काळात साईबाबांचे मुख्य समाधी मंदिर तसेच संस्थानच्या अखत्यारीतील इतर सर्व मंदिरे दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

shirdi saibaba temple साई दरबारातून महत्त्वाची अपडेट या दिवशी साईबाबांचे दर्शन घेता नाही येणार हे कारण आलं समोर

शिर्डी: "अनंत कोटी ब्रह्मांडनायक" साईंच्या चरणी लीन होणाऱ्या जगभरातील लाखो भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अवकाशातील खगोलीय चमत्कार आणि अध्यात्म यांचा संगम पुन्हा एकदा शिर्डीच्या पावन भूमीत अनुभवायला मिळणार आहे. येत्या सोमवारी, 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या 'खग्रास चंद्रग्रहणा'मुळे साईबाबांच्या समाधी मंदिरातील दैनंदिन वेळापत्रकात आणि दर्शन व्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शास्त्र आणि परंपरेचा सन्मान राखत संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

निसर्ग आणि विज्ञानाच्या नियमांनुसार, चंद्रग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो. सोमवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपासून सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत, म्हणजेच सुमारे 3 तास 28 मिनिटांच्या कालावधीसाठी खग्रास चंद्रग्रहण असणार आहे.

धार्मिक परंपरेचे जतन करताना, ग्रहणकाळात साईबाबांच्या पवित्र समाधीवर तुळशीची पाने, आणि हरळीची दुर्वा अर्पण करून समाधी झाकली जाणार आहे. मंदिराचे दरवाजे जरी भाविकांसाठी बंद असले, तरी गाभाऱ्यात भक्तीचा जागर सुरूच राहणार आहे. या 3 तास 28 मिनिटांच्या काळात संस्थानचे 15 विशेष पुजारी विशेष पूजा, अखंड मंत्रोच्चार, जप आणि विविध धार्मिक विधी पार पाडणार आहेत. ग्रहणकाळातील ही साधना विश्वाच्या कल्याणासाठी महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा: Today's Horoscope 2026 : या राशींना नवीन काम सुरू करण्यासाठी आज उत्तम काळ; वाचा आजचे राशिभविष्य

या काळात साईबाबांचे मुख्य समाधी मंदिर तसेच संस्थानच्या अखत्यारीतील इतर सर्व मंदिरे दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी सात वाजता शुद्धीकरणाचे विधी पार पडतील. भारतवर्षातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, नर्मदा, कावेरी आणि गंगा या सप्त नद्यांच्या जलाने साईबाबांच्या मूर्तीला आणि समाधीला मंगलस्नान घातले जाईल. या मंगलस्नानानंतर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही भावपूर्ण छोटी आरती आणि त्यानंतर नियमित धुपारती होईल. हे सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झाल्यानंतरच भाविकांसाठी दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात येईल.

संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ग्रहणोत्तर विधी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता 'शेजारती' होऊन मंदिर दर्शनासाठी बंद होईल. शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि नियोजित वेळेनुसारच दर्शनासाठी प्रस्थान करावे. दूरवरून येणाऱ्या साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थानने ही माहिती अगोदरच प्रसिद्ध केली असून, या काळात व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंदिर प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: Rohit Pawar : 'हा अहवाल किती गांभीर्याने बनवला...'; रोहित पवार यांची DGCA च्या अहवालावर पहिली प्रतिक्रिया


सम्बन्धित सामग्री