Monday, May 12, 2025 09:12:45 PM

अंगावरील हळद उतरण्यापूर्वी जवान प्रज्वल रुपनर देशसेवेसाठी रवाना; मुस्लिम बांधवांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यासाठी सीमेकडे रवाना झालेला सांगलीचा जवान प्रज्वल रूपनर ठरतोय देशप्रेमाचा आदर्श

अंगावरील हळद उतरण्यापूर्वी जवान प्रज्वल रुपनर देशसेवेसाठी रवाना मुस्लिम बांधवांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा

सांगली: सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेला जवान प्रज्वल रूपनर याने देशप्रेमाचा आदर्श घालून दिला आहे. नुकताच विवाहबंधनात अडकलेला प्रज्वल सध्या रजेवर गावी आला होता. पण सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ सेवा हजर राहण्याचा आदेश मिळताच, अंगावरून हळदही उतरायची बाकी असतानाच तो देशसेवेसाठी पुन्हा एकदा सीमेकडे रवाना झाला.

सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढलेला असून लष्कराकडून तैनातीसाठी जवानांना बोलावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रज्वलला अचानक सेवा हजर होण्याचे आदेश मिळाले. अशा वेळी, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य मागे ठेवत, एका देशभक्त जवानाने आपल्या जबाबदारीला प्राधान्य दिले आणि कोणतीही तक्रार न करता आपल्या कर्तव्यासाठी तो निघून गेला.

हेही वाचा: पाकड्यांना पाठीशी घालणाऱ्या चीनवर भारताचा हल्लाबोल

प्रज्वलचा मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना होताना एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षण घडला. मिरजेतील मुस्लिम समाजबांधवांनी विशेष पुढाकार घेत त्याचा सत्कार केला आणि देशसेवेच्या या समर्पित योद्ध्याला शुभेच्छा दिल्या. "भारत माता की जय", "पाकिस्तान मुर्दाबाद", अशा देशभक्तीपर घोषणा देत उपस्थितांनी जवानाला निरोप दिला.

जाती, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन जेव्हा देशहिताची गोष्ट समोर येते, तेव्हा अशा दृश्यांतून खरी एकजूट दिसून येते. मुस्लिम बांधवांनी लष्करातील जवानाचा केलेला सत्कार हीच आपल्या देशातील विविधतेतील एकतेचे प्रतिक आहे. प्रज्वल रूपनरचा हा सन्मान ही समाजाला प्रेरणा देणारी बाब ठरली आहे.

स्थानिक नागरिक, तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती. त्यांनी प्रज्वलला शुभेच्छा देत अभिमान व्यक्त केला. एक सैनिक जेव्हा देशासाठी झटतो, तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, असा सूर या वेळी सर्वत्र ऐकू येत होता.

प्रज्वल रूपनर याने फक्त आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, तर देशप्रेम, शिस्त आणि निस्वार्थ सेवा याचा एक जिवंत आदर्श निर्माण केला. अशा जवानांमुळेच देश सुरक्षित आहे. अशा शूरवीर जवानास संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमानपूर्वक सलाम.
 


सम्बन्धित सामग्री