पुणे: पहाटे सहाची वेळ... पुण्यातील 'व्हीआयपी सर्किट हाऊस'चा परिसर... आणि कार्यकर्त्यांची तीच नेहमीची गजबज. निमित्त आहे नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या जनसंपर्क मोहिमेचे. दिवंगत नेते अजित पवार यांनी गेल्या 15 वर्षांपासून जो शिस्तबद्ध 'पहाटेचा शिरस्ता' जपला होता, तोच वारसा आता सुनेत्रा वहिनी समर्थपणे पुढे नेत असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. दादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न थेट ऐकण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा 'पहाटेचा दरबार' भरवला आहे.
अजितदादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते प्रशासनावर पकड असणारे एक कुशल 'व्यक्तिमत्व' होते. सुमारे 15 वर्षे पुण्याचे पालकमंत्री असताना, त्यांनी दर शुक्रवारी सकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांना भेटण्याचा नियम कधीच मोडला नाही. त्यानंतर शनिवारी बारामतीचा दौरा हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम असे. दादांच्या निधनानंतर या शुक्रवारी पहिल्यांदाच सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नवनियुक्त सदस्य अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या 'वहिनीं'ना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झाले आहेत.
अजितदादांच्या निधनानंतर गुरुवारी पुण्यात झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठक एका वेगळ्याच वातावरणात पार पडली. बैठकीला अधिकारी, सचिव आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती तर होती, मात्र त्या बैठकीत दादांचा तो जरबयुक्त आवाज आणि मिश्कील टिप्पण्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. एखाद्या कामात कुचराई झाल्यास अधिकाऱ्यांची जागेवरच 'कानउघाडणी' करणारे आणि चांगले काम केल्यास 'शाबासकीची थाप' देणारे अजितदादा आज नसले, तरी त्यांनी घालून दिलेली प्रशासकीय शिस्त आजही या दालनांमध्ये गुंजत आहे.
हेही वाचा: Gold-Silver Rate: सोन्याने तोडले सर्व अंदाज, चांदीही धावली पुढे; आजचा 10 ग्रॅम दर पाहून ग्राहक चक्रावले
अजितदादांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी आता विविध स्तरांतून मागणी होत आहे. कोल्हापूर येथे दादांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमला आणि विधानभवनातील ऐतिहासिक 'झुंबर' सभागृहाला 'दिवंगत अजित पवार' यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. हा नामविस्तार म्हणजे दादांच्या विकासकामांना दिलेली एक मोठी आदरांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
अजितदादांच्या कार्यपद्धतीची खासियत म्हणजे 'शब्द दिला की तो पाळायचा' आणि 'काम वेळेतच पूर्ण करायचे'. बारामतीपासून बीडपर्यंत आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत प्रत्येक विभागाची बैठक त्यांनी ज्या आत्मीयतेने आणि अभ्यासाने हाताळली, ती आता सुनेत्रा पवारांच्या समोर एक आदर्श म्हणून उभी आहे. कार्यकर्त्यांची निवेदने, आमदारांच्या मागण्या आणि अधिकाऱ्यांकडून घेतला जाणारा कामाचा आढावा, हा 'मॅरेथॉन' सिलसिला आता नव्या ऊर्जेने पुन्हा एकदा सुरू होत आहे.
नेत्याचे जाणे हे कधीही न भरून येणारे नुकसान असते, मात्र त्यांचा वारसा आणि विचारधारा जेव्हा कृतीत उतरते, तेव्हा कार्यकर्त्यांना एक नवा आधार मिळतो. सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी आणि त्यांनी जपलेला 'शुक्रवारचा शिरस्ता' हे पुण्याच्या राजकारणातील एका नव्या पर्वाचे संकेत देत आहे. दादांची 'पहाटेची वेळ' आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सामान्यांच्या आयुष्यात विकासाचा सूर्योदय घेऊन येईल, अशी आशा सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: What is Acholuric Jaundice: रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे गूढ उकलले; 'हा' आजार ठरला जीवघेणा, 'सायलेंट किलर' आजार नेमका आहे तरी काय?