मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 मे 2025 पासून, प्रतीक्षा यादीतील तिकिटे असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. हा निर्णय महाकुंभमेला आणि तत्सम गर्दीच्या प्रसंगांदरम्यान डब्यांमधील अनधिकृत गर्दी पाहता घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, जिथे प्रतीक्षा यादीतील प्रवासी एसी डब्यांमध्ये स्थान घेताना दिसत होते, यामुळे खऱ्या अर्थाने आरक्षित तिकिटधारकांचे हाल होत होते.
प्रतीक्षा यादीवाल्यांना आता फक्त अनारक्षित डब्यांमध्येच परवानगी
नवीन नियमानुसार, कोणतीही प्रतीक्षा यादीतील तिकिट मग ते ऑनलाइन आयआरसीटीसीवरून घेतले असो किंवा काउंटरवरून स्लीपर किंवा वातानुकूलित कोचसाठी वैध मानली जाणार नाही. अशा प्रवाशांना केवळ अनारक्षित (जनरल) डब्यांमधूनच प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल. हा निर्णय प्रवासादरम्यान अनुशासन राखण्यासाठी, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि कोचमधील क्षमता ओलांडण्याची समस्या दूर करण्यासाठी घेतला गेला आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासात, अनधिकृत प्रवासी प्रवास करणाऱ्यांच्या विश्रांतीस अडथळा ठरत होते.
हेही वाचा: महाराष्ट्रात ओला, उबर, रॅपिडो ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई मिळणार
नियमभंग केल्यास दंडाची तरतूद
जर प्रतीक्षा यादीतील प्रवासी कोणत्याही आरक्षित कोचमध्ये सापडला, तर त्याला प्रवास केलेल्या कोचचे भाडे तर द्यावेच लागेल, पण त्यासोबतच दंडही भरावा लागेल. स्लीपर कोचमध्ये अनधिकृतपणे प्रवास केल्यास ₹250 पर्यंत आणि एसी कोचमध्ये प्रवास केल्यास ₹440 पर्यंत दंड आकारला जाईल. यासोबत, प्रवासी तिकीट तपासणी अधिकारी (टीटीई) नियम तोडणाऱ्या प्रवाशांना पुढच्या स्थानकावर उतरवून त्यांच्यावर कारवाई करतील. आरक्षित कोचमध्ये अनधिकृत प्रवेश पूर्णतः निषिद्ध करण्यात आला आहे.
आरक्षण प्रणालीत बदल, ओटीपी पडताळणी सक्तीची
भारतीय रेल्वेने आगाऊ आरक्षण कालावधी (Advance Reservation Period) 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणला आहे. याचा अर्थ असा की आता प्रवाशांना केवळ दोन महिन्यांपूर्वीच तिकिटे आरक्षित करता येतील. शिवाय, ऑनलाइन बुकिंग करताना आता वन-टाईम पासवर्ड (OTP) पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे, जे फसवणुकीच्या घटना कमी करण्यास उपयुक्त ठरेल. एकूणच, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवासातील पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत, जी भविष्यात रेल्वे प्रवास अधिक नियोजित आणि शांततेत पार पडण्यासाठी मदत करतील.