फेब्रुवारी महिना मध्यावर असताना होळीच्या आधीच थंडी कमी झालेली जाणवते आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्यामुळे आणि आकाश बहुतांश ठिकाणी स्वच्छ असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. मागील काही काळाच्या तुलनेत आज तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या भागांत आज चांगलाच उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा सुटू लागणार आहेत.
हेही वाचा- Gold-Silver Rate: सोन्याने तोडले सर्व अंदाज, चांदीही धावली पुढे; आजचा 10 ग्रॅम दर पाहून ग्राहक चक्रावले
यादरम्यान आज मुंबईत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस असून किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस इतके असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचसोबत मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअस इतके असल्यामुळे याठिकाणी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहील त्यासोबतच मुंबई पासून ते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात आर्द्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेत उकाड्याची जाणीव वाढणार आहे.