Devendra Fadnavis: माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीवरून सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी गवईंवर केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. श्याम मानव हे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी विधाने करत असल्याची तोफ फडणवीसांनी डागली आहे.
धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणे ठरले निमित्त
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्य प्रदेशात जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे नतमस्तक होणे कितपत योग्य आहे, असा सवाल काही स्तरातून विचारला गेला.
श्याम मानव यांचा प्रहार: "आंबेडकरांचे नाव घेऊ नका"
या भेटीवर 'अंनिस'चे संस्थापक श्याम मानव यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च पद भूषवलेली व्यक्ती जर धीरेंद्र शास्त्रींपुढे झुकत असेल, तर तो धक्कादायक प्रकार आहे. भूषण गवई जर स्वतःला आंबेडकरी विचारांचे मानत असतील, तर त्यांनी अशा ठिकाणी नतमस्तक होऊन आंबेडकरांचा वारसा सांगण्याचा अधिकार गमावला आहे." याचवेळी त्यांनी धीरेंद्र शास्त्रींना दिलेले 80 लाखांचे आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित केले.
हेही वाचा - Sanjay Shirsat: ‘बाबागिरी सोडा, राजकारणात या!’ 'त्या' वादग्रस्त विधानानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी बागेश्वर बाबांचा घेतला समाचार
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
श्याम मानव यांच्या विधानाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, "श्याम मानव कोण आहेत भूषण गवईंना सांगणारे? कुणाला कोणता विचार मानायचा आणि कुणाचे आशीर्वाद घ्यायचे, याचे सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? अलिकडच्या काळात त्यांना कुणी विचारत नाही, त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी ते रोज नवी विधाने करत आहेत."