महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. याप्रकरणी अनेक ठिकाणी पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात येताय. विहंप आणि बजरंग दलाचं याप्रकरणी राज्यभर उग्र आंदोलन पाहायला मिळतंय. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय. देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होऊ देणार नाही, इथे महिमामंडन होईल तर, छत्रपती शिवरायांचे होईल', असं फडणवीस म्हणालेत.
हेही वाचा: खासदार सुप्रिया सुळेंचा कुणावर साधला निशाणा?
त्याचबरोबर शिवजंयतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या कबरीवरून प्रतिक्रिया दिली आहे. 'आज यातून एक संदेश निश्चितपणे जात आहे. या देशामध्ये महिमामंडन होईल. तर, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं होईल. पण औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही', असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
तसेच 'खरंतर एएसआयनं पन्नास वर्षांपूर्वी या कबरीला संरक्षण दिलं होतं. त्यामुळे या कबरीचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारवर येऊन पडली आहे. ज्या औरंगजेबानं आमच्या हजारो लोकांची हत्या केली. त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागत आहे. हे दुर्देव आहे'. 'मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही. कबरीचं उदात्तीकरण कधीही होऊ देणार नाही. जर कुणी कबरीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तर, तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही', असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.