Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. उद्या पश्चिम रेल्वेने 102 लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
गाड्या रद्द होण्याचे मुख्य कारण
पश्चिम रेल्वेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कांदिवली कारशेडमधील गाड्यांचा प्रवेश (Entry) आणि निर्गमन (Exit) तांत्रिक कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, कांदिवली आणि मालाड दरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' जलद मार्गांवर वेगाचे निर्बंध (Speed Restrictions) लादण्यात आले आहेत. या पायाभूत सुविधांच्या कामामुळे 21 जानेवारी रोजी उपनगरीय सेवेवर मोठा परिणाम होणार आहे.
बोरिवली आणि विरारमधील प्रवाशांना सर्वाधिक फटका
रद्द करण्यात आलेल्या एकूण 102 गाड्यांपैकी सर्वाधिक फेऱ्या बोरिवली आणि विरार स्थानकांवरील आहेत. बुधवारी रद्द केलेल्या 102 गाड्यांपैकी बोरिवलीहून एकूण 49 फेऱ्या, तर विरारवरून एकूण 20 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय गोरेगाव, मालाड, अंधेरी, भाईंदर आणि वांद्रे स्थानकांवरील गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - Belasis Bridge: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! चार महिने आधीच पूर्ण झाला बेलासिस पूल; पालिकेचा नवा रेकॉर्ड
AC आणि 15 डब्यांच्या लोकलवरही परिणाम
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रद्द केलेल्या गाड्यांमध्ये केवळ साध्या धीम्या आणि जलद गाड्याच नाहीत, तर प्रवाशांच्या पसंतीच्या AC Local आणि 15 कोच गाड्यांचाही समावेश आहे. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन केले आहे. स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास प्रवासाचे पर्यायी मार्ग निवडावेत. रद्द केलेल्या गाड्यांची सविस्तर यादी संबंधित स्टेशन मास्टरच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.