पुणे : मुंबईतील विलेपार्ले मंदिर पाडल्याचा निषेध जैन समाजाकडून करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात जैन मंदिर पाडल्यामुळे जैन समाजाकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले (पूर्व) येथील दिगंबर जैन मंदिर 16 एप्रिल 2025 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील सकल जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून मंदिर पूर्ववत पुनर्निर्मितीची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदार संजय नागटिळक यांना देण्यात आले.
हेही वाचा : प्रभादेवी पूल आजपासून बंद; रात्री 9 वाजल्यापासून वाहतूक करता येणार नाही
जैन समाजाने ही घटना धार्मिक भावना दुखावणारी असल्याचे नमूद करत, शांतताप्रिय समाजावर झालेला अन्याय तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन मंदिराबाबत वाद काय?
मुंबईतील विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरामध्ये नेमिनाथ सहकारी आवास इमारतीच्या शेजारी एक 32 वर्षांपूर्वीचं दिगंबर जैन मंदिर होतं. हे मंदिर एका इमारतीच्या पार्किंगमध्ये होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी जागेवर दावा करणारे आणि मंदिर ट्रस्टी यांच्यामध्ये न्यायालयीन लढादेखील सुरु आहे. या प्रकरणाची सत्र न्यायलयात सुनावणी झाली असता मंदिर पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चार वेळा मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते. जर पाचव्या वेळी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही, तर पालिका अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. या प्रकरणी 16 तारखेला 11 वाजता सुनावणी पार पडणार होती. परंतु 16 तारखेला 8 वाजता महापालिकेने कारवाई केली. या प्रकरणी 16 तारखेला सुनावणी झाली तेव्हा पालिकेची कारवाई सुरू असल्याचं सांगितलं. त्यावर कोर्टाने कारवाई थांबवण्यास सांगत पालिकेवर ताशेरे ओढले, असे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाला आणि विलेपार्लेमध्ये आंदोलन केले.