Dahisar Mira Bhayandar Metro : मिरा-भाईंदरमधील लाखो प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर या 'मेट्रो 9A' मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. या आठवड्याअखेर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास, पुढच्या आठवड्यापासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते. सध्या केवळ उद्घाटन सोहळ्याच्या अधिकृत तारखेची प्रतीक्षा आहे.
7 महिन्यांच्या चाचण्यांनंतर 'ग्रीन सिग्नल'
एमएमआरडीएने (MMRDA) मे 2025 पर्यंत या मार्गिकेचे 98 टक्के काम पूर्ण केले होते. त्यानंतर गेल्या 7 महिन्यांपासून या रुळांवर विविध तांत्रिक चाचण्या घेतल्या जात होत्या. 1 ते 3 जानेवारी 2026 दरम्यान मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाच्या पथकाने या संपूर्ण प्रकल्पाची बारकाईने पाहणी केली. पाहणीत सुचवण्यात आलेल्या काही किरकोळ सुधारणांचे काम आता अंतिम टप्प्यात असून, मेट्रो धावण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
हेही वाचा - BMC Mayor: मुंबईचा महापौर भाजपचाच; भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून गौप्यस्फोट, या तारखेला ...
प्रवाशांना नेमका काय फायदा?
सध्या मिरा-भाईंदरमधून अंधेरी किंवा मुंबईच्या इतर भागांत जाण्यासाठी प्रवाशांना दहिसर टोलनाक्यावर भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, ही मेट्रो सुरू झाल्यावर:
थेट कनेक्टिव्हिटी: काशिगाव, पांडुरंगवाडी आणि मिरागाव या स्थानकांवरून प्रवाशांना थेट अंधेरी गाठता येईल.
वेळेची बचत: रस्ते मार्गावरील 1 ते 1.5 तासांचा प्रवास आता काही मिनिटांवर येईल.
लोकलवरील ताण कमी: रेल्वेच्या गर्दीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2019 पासून सुरू होता संघर्ष
मिरा-भाईंदरला मुंबईशी मेट्रोने जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. 2018 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि 2019 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत हे काम विभागले गेले आहे. यातील पहिल्या टप्प्याच्या यशामुळे आता मिरा-भाईंदरमधील गृहनिर्माण आणि दळणवळण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.