दिल्ली: मंगळवारी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात 5 मोठे निर्णय घेतले. गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी पोहोचले असून, सुरक्षा परिस्थितीच्या गांभीर्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा: प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार; पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले
परराष्ट्र मंत्रालयात महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत देशातील अनेक राजदूतांना बोलावण्यात आले आहे. जर्मनी, जपान, पोलंड, ब्रिटन आणि रशियासह इतर देशांचे राजदूत परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात आले आहेत. मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत या राजदूतांना माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबर भारताच्या सुरक्षेच्या चिंतेबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. माहितीनुसार, हल्ल्यामागील संभाव्य दहशतवादी संघटना, पाकिस्तानची भूमिका आणि सुरक्षा संस्थांनी केलेल्या कारवाईबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राजदूतांना देतील.
यादरम्यान, शुक्रवारी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतील आणि दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी भेट देतील. लष्करी कमांडर आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत तेथे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील आणि भविष्यातील रणनीती ठरवतील. दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईसाठी लष्कराच्या या पावलाला एक मजबूत संकेत मानले जात आहे.