Wednesday, May 21, 2025 02:14:17 PM

प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार; पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार राज्यातील मधुबनी येथे पोहोचले. 'दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल', अशी घोषणा मोदींनी केली.

प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले

बिहार: मंगळवारी, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार राज्यातील मधुबनी येथे पोहोचले. राष्ट्रीय पंचायती राज कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल,' अशी घोषणा मोदींनी केली.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणी आपला मुलगा गमावला, तर काहींनी आपला भाऊ गमावला. इतकंच नाही, तर काहींनी आपला जीवनसाथी गमावला. त्यापैकी काही बंगाली होते, तर काही गुजराती आणि बिहारचे होते. आज, कारगिलपासून ते कन्याकुमारीपर्यंत, सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.

शेवटपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचा पाठलाग करू

यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यासपीठावरून इंग्रजीत भाषण देत म्हणाले की, 'त्या दहशतवाद्यांना आम्ही पृथ्वीच्या शेवटच्या कोपऱ्यात हाकलून लावू. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. त्या प्रत्येक दहशतवाद्याला शिक्षा होईल.' पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'न्याय सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या संकल्पामध्ये संपूर्ण देश एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या नेत्यांचे आणि जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो.'

हेही वाचा: सर्वपक्षीय बैठकीसाठी एआयएमआयएमला आमंत्रण नाही; असदुद्दीन ओवैसींचा संताप
 

पहलगाममधील मृतांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मंगळवारी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये ज्या पद्धतीने निष्पाप लोकांना मारण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. त्यांच्या दुःखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. सध्या उपचार घेत असलेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मी हे जाहीरपणे सांगू इच्छितो की, हल्लेखोरांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही त्यापेक्षा वाईट शिक्षा मिळेल.' या पंचायती राज कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंचावरून मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले की, 'माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक प्रार्थना करू इच्छितो. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या जागी बसून 22 तारखेला गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांना आठवू शकता. सर्वप्रथम आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. त्यानंतर मी माझे भाषण सुरू करेन.'


सम्बन्धित सामग्री