पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. शुक्रवारी, 232 प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले आहेत. त्यासोबतच, शुक्रवारी महाराष्ट्रात तब्बल 232 प्रवासी येणार आहेत. या प्रवाशांच्या परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत व्यवस्था करण्यात आली असून या विमानांचा खर्च राज्य सरकार उचलेल.
हेही वाचा: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्य्रात काढले मुसलमानांनी आंदोलन; जितेंद्र आव्हाड उपस्थित
पर्यटकांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू
केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना सुखरूप आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू ते काश्मीर हा रस्ता बंद असल्यामुळे काही पर्यटक अजूनही जम्मू येथे अडकले आहेत. रेल्वे रद्द झाल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्रास झाला आहे. आम्ही महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगर मार्गे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांमधून नागरिकांकडून अजूनही फोन येत आहेत आणि त्यांच्यासाठी व्यवस्था केली जात आहे.'
घरी शुभकार्य... मात्र मंत्री मोहोळ वॉररूममध्ये व्यस्त
शुक्रवारी केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुतणी अश्विनीचे लग्न आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोहोळ कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मंत्री मोहोळ स्वतः काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आणि आवश्यक ती मदत करण्यात व्यस्त आहेत.