मुंबई: गुरुवारी राज्यभरात मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. यादिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यासोबतच, ज्यांनी महाराष्ट्र राज्याला घडवण्यासाठी आणि स्वतंत्र राज्य बनवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. या राज्याला घडवण्यामागे अनेक थोर नेत्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यापैकी एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्याप्रकारे त्यांनी महाराष्ट्र राज्याला घडवले आहे, त्याला अधोरेखित करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
जनतेचे खरे प्रतिनिधी:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकारणी नेते नसून एक विचारवंत, समाजाला घडवणारे आणि जनतेचे खरे प्रतिनिधी होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाळासाहेबांनी 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या व्यथा, अन्याय आणि दुःख दर्शवण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे माध्यम मराठी जनतेचे आरसा बनले.
हेही वाचा: राज्यभरात १ मे रोजी महाराष्ट्र दिन 'का' साजरा केला जातो? जाणून घ्या
मुंबईतील परप्रांतीयांचे वाढते वर्चस्व:
1960 नंतर जरी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असली, तरीही मराठी लोकांच्या हक्कांसाठीचा लढा बाळासाहेबांनी थांबवला नाही. मुंबईसारख्या महानगरात बाहेरील लोकांचे वर्चस्व वाढत होते आणि मराठी तरुण बेरोजगारी, अपमान आणि हीन दर्जाच्या भावनांमुळे त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये 'शिवसेना' या राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवसेनेच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे मराठी माणसाला न्याय मिळवून देणे, त्यांना त्यांचे हक्क परत मिळवून देणे आणि मराठी अस्मितेला पुन्हा जागृत करणे होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 'मराठी माणूस प्रथम' हे ब्रीद घेऊन अनेकदा आंदोलने केली. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये सर्वप्रथम मराठी माणसाला प्राधान्य मिळावे यासाठी त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी मराठी जनतेमध्ये स्वाभिमानाची जाणीव जागवली.
महाराष्ट्र दिनानिमित्त, बाळासाहेबांनी केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनेक सामाजिक चळवळी केल्या होत्या, हे आपण विसरू शकत नाही. त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांना स्थान देऊन समाजाला एकतेचा संदेश दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण केले आणि अनेक मराठी कलाकार, लेखक आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले.