मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या “ऑपरेशन टायगर” या चर्चेने नव्या राजकीय हालचालींना वेग दिला आहे. सत्तांतरानंतर पुन्हा एकदा शिवसेना गटांमध्ये हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा रंगत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही खासदारांशी बैठक घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे गटातील काही आमदार-खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप अधिकृत पुष्टी नसल्याने याबाबत प्रश्नही उपस्थित होत आहे.
हेही वाचा: Ration Vatap Update: अन्न पुरवठा विभागाकडून मिळाली मोठी अपडेट; रेशन कार्डधारकांना मिळणार 'या' वस्तू, जाणून घ्या
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी या चर्चांवर भाष्य करत संयमित प्रतिक्रिया दिली आहे. “मला या बैठकीबाबत ठोस माहिती नाही. माध्यमांनी सूत्रांच्या आधारे बातम्या दिल्या असतील, तर त्या सूत्रांचा शोध घेणं आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
भुजबळ यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदार-खासदारांना योग्य प्रकारे सांभाळतील. “पक्ष नेतृत्व त्यांच्या नेत्यांना एकत्र ठेवण्यात सक्षम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, “ऑपरेशन टायगर” ही केवळ अफवा आहे की प्रत्यक्षात सुरू असलेली राजकीय रणनीती, हे येत्या काही तासांत स्पष्ट होऊ शकते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.
हेही वाचा: MHADA New Portal: म्हाडा आणत आहे स्वतःचे 'हायटेक' रेंटल पोर्टल; दलालांची मनमानी थांबणार, भाड्याचे घर शोधणे आता होणार सोपे