पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने 185 जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. या जबरदस्त मुसंडीमुळे बंगालच्या राजकारणात मोठे सत्तांतर होण्याचे संकेत मिळत असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. निकाल अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी, सुरुवातीच्या या मोठ्या आघाडीने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर केल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपच्या या विजयाची चाहूल लागताच कोलकात्यात कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोष सुरू केला आहे. अनेक ठिकाणी भाजप समर्थकांनी एकत्र येत 'झालमुढी' (मुुरमुऱ्यांचा पदार्थ) खात त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे काही उत्साही कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि त्यांनी तिथे 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. या विजयाच्या घोषणांमुळे परिसरात राजकीय तापमान वाढले असून, वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे, या निकालाच्या कलानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "निवडणूक आयोग पूर्णपणे मनमानी करत असून अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आली आहे," असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. मतमोजणीत काहीतरी फेरफार होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, या कठीण काळात आपल्या कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Mamata Banerjee: 'अनेक ठिकाणी मतमोजणी जाणीवपूर्वक रोखली!'; ममता बॅनर्जींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांना दिला मोठा संदेश
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नये. "निराश होऊन बूथ सोडू नका, जोपर्यंत अंतिम निकाल हाती येत नाही तोपर्यंत तिथेच ठाम उभे राहा," असे निर्देश त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. सुरुवातीच्या कलानं भाजपला आघाडी दाखवली असली तरी, अंतिम निकालात चित्र बदलेल असा विश्वास ममतादीदींना अद्यापही वाटत आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रांवर कार्यकर्त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप 185 जागांवर आघाडीवर असून, सत्तास्थापनेच्या दिशेने त्यांची वेगाने घोडदौड सुरू आहे. कोलकात्यातील रस्त्यांवर भगव्या झेंड्यांचा महापूर आला असून, ऐतिहासिक विजयाच्या अपेक्षेने भाजपचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते जल्लोषात मग्न आहेत. आता निवडणूक आयोग ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर काय भूमिका घेते आणि उर्वरित फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर बंगालच्या सत्तेची चावी कोणाकडे जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Baramati Bypoll Election Result: बारामतीत सुनेत्रा पवारांची ऐतिहासिक झेप; 15 व्या फेरीतच अजित पवारांचा रेकॉर्ड मोडत प्रस्थापित केला नवा विक्रम