Sunil Gavaskar: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर दिग्गज क्रिकेटपटूंनी कडक शब्दांत टीका केली आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या दृष्टिकोनावर ताशेरे ओढताना म्हटले की, भारताने दक्षिण आफ्रिकेकडून धडा घ्यायला हवा होता. "भारतीय फलंदाजांनी ब्रेव्हिस आणि मिलर यांच्यातील भागीदारीतून शिकायला हवे होते, पण तसे झाले नाही. भारतीय खेळाडू अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरले, त्यांनी प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या विकेट्स गमावल्या," अशा शब्दांत गावस्कर यांनी खेळाडूंच्या अहंकारावर बोट ठेवले.
परिस्थितीशी जुळवून घेण्यात भारतीय फलंदाज अपयशी
गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले की, टी-20 क्रिकेट म्हणजे केवळ प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर मारणे नव्हे. भारताने दक्षिण आफ्रिकेकडून कोणताही धडा घेतला नाही, हे दुर्दैवी आहे. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक विभागात आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय फलंदाजांनी क्रिजवर टिकून राहण्याऐवजी आक्रमकतेचा चुकीचा मार्ग निवडल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला, असेही त्यांनी नमूद केले.
अक्षर पटेलला वगळल्याने अजिंक्य रहाणे आश्चर्यचकित
दुसरीकडे, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या 'प्लेइंग इलेव्हन' निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अक्षर पटेल सारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर त्याने आश्चर्य व्यक्त केले. रहाणे म्हणाला, "अक्षर खेळला नाही याचे मला खरोखर नवल वाटते. व्यवस्थापन नक्की काय विचार करत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. वॉशिंग्टन सुंदर हा नक्कीच चांगला खेळाडू आहे, परंतु अक्षर कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची क्षमता राखतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघात डावखुरे फलंदाज आहेत म्हणून सुंदरला संधी देणे, हे कधीकधी उलटे पडू शकते."
हेही वाचा- T20 WC 2026, Super 8: भारताच्या हातातून सुवर्णसंधी निसटली! दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावताच भारताच्या नावे नकोसा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेचे 'परफेक्ट' नियोजन; सकलेन मुश्ताक
भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने दक्षिण आफ्रिकेच्या सांघिक कामगिरीचे कौतुक केले आहे. मुश्ताकच्या मते, दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध आपल्या सर्व योजनांची अंमलबजावणी अत्यंत अचूकपणे केली. भारतीय संघाची ताकद कितीही असली, तरी दक्षिण आफ्रिकेने त्यांना बॅकफूटवर ढकलले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध खेळामुळेच भारताला पराभवाचा धक्का बसल्याचे त्याने स्पष्ट केले.