T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे दोन्ही देशांसाठी हाय व्होल्टेज थरार असतो. बहुतेक सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराजयाचं तोंड बघावं लागतं. आता पाकिस्तानने बांगलादेशच्या पाठिशी उभे राहत असल्याचे सांगत भारताशी सामना न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे क्रिकेटच्या मैदानावर भारतासमोर उभे राहण्याची हिंमत दाखवण्याऐवजी पाकिस्तानने आता एक नवीनच पळवाट शोधली आहे, असे अनेकांना वाटू शकते. पण काहीही झालं तरी हा रडीचा डाव पाकिस्तानला महागात पडेल, असे चित्र दिसू लागले आहे.
पाकिस्तानचा स्वतःच्याच अंगलट येणारा पवित्रा आणि वॉकओव्हर
श्रीलंका आणि भारतात संयुक्तपणे होणाऱ्या या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला 2026 रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा महामुकाबला होणार होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) असे जाहीर केले आहे की, त्यांच्या सरकारने भारतासोबत सामना खेळण्यास परवानगी नाकारली आहे. पाकिस्तान संपूर्ण वर्ल्ड कप खेळणार आहे, पण फक्त भारतासोबतच्या सामन्यात उतरणार नाही. या निर्णयामुळे भारताला न खेळताच 2 पॉइंट्स मिळतील (वॉकओव्हर), पण क्रिकेट चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. मुळात बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानला IPL मधून बाहेर काढल्याच्या वादातून हे नाट्य सुरू झाले. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार दिल्याने त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली, पण पाकिस्तानने मात्र वेगळाच राग आळवला आहे.
2289 कोटींचा चुराडा; पाकिस्तान क्रिकेटची 10 वर्षांचीही कमाई एवढी नाही!
भारत-पाकिस्तान हा केवळ सामना नसून तो एक मोठा 'ब्रँड' आहे. एका अंदाजानुसार, या एका सामन्यातून सुमारे 25 कोटी डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 2,289 कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. आयसीसी आणि पीसीबीचे माजी प्रमुख समी-उल-हसन बर्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची संपूर्ण वर्षाची कमाई केवळ 3.55 कोटी डॉलर आहे. म्हणजे ज्या एका सामन्यातून 25 कोटी डॉलर मिळणार होते, तोच खेळायला पाकिस्तानने नकार दिला आहे. थोडक्यात, स्वतःच्या खिशात दमडी नसताना करोडोंच्या महसूल बुडवण्याचा हा 'पाकिस्तानी' पराक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
हेही वाचा - India vs Pakistan : निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं?
ब्रॉडकास्टर्सचे धाबे दणाणले; 40 लाखांचा 10 सेकंदाचा स्लॉट!
या हाय-व्होल्टेज सामन्यावर पाणी फिरल्यामुळे ब्रॉडकास्टर्सना (जियोस्टार) मोठा आर्थिक धक्का बसणार आहे. या एका मॅचमधून जाहिरातींच्या माध्यमातून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची कमाई अपेक्षित होती. सामन्याच्या दरम्यान केवळ 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी कंपन्या 40 लाख रुपये मोजायला तयार होत्या. आता सामनाच होणार नसल्याने आयसीसी (ICC) पाकिस्तानवर मोठा आर्थिक दंड ठोठावू शकते. आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तानला हा दंड भरताना नाकीनऊ येणार आहेत, पण "नाक कापले तरी चालेल, पण भारतासमोर मान झुकवणार नाही" ही त्यांची वृत्ती त्यांनाच महागात पडणार आहे.
कंगाल पाकिस्तानवर आयसीसीची टांगती तलवार
आयसीसीकडे पीसीबीवर (PCB) आर्थिक दंड लावण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि असा दंड लावला तर पाकिस्तान क्रिकेट स्वतःला विकूनही तो भरू शकणार नाही, अशी स्थिती आहे. कारण, भारत-पाकिस्तान सामन्याची व्हॅल्यू अफाट आहे आणि एका मॅचमुळे संपूर्ण वर्ल्ड कपचे व्यावसायिक गणित बिघडू शकते. जर पाकिस्तानने हट्ट सोडला नाही, तर त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने मोठा दंड त्यांना भरावा लागू शकतो. मैदानावर हरण्यापेक्षा सामनाच न खेळण्याचा पाकिस्तानचा हा 'मास्टर प्लॅन' त्यांच्याच क्रिकेटच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.
हेही वाचा - IND vs PAK T20 World Cup : 'कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध खेळणार नाही...'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा