India vs Pakistan U19 World Cup : अंडर-19 विश्वचषकात ज्या क्षणाची भारतीय क्रिकेट रसिक वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरू असतानाच भारतीय संघाने अधिकृतपणे उपांत्य फेरीत (Semi-final) धडक मारली आहे. विशेष म्हणजे, सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच केवळ एका तांत्रिक समीकरणामुळे पाकिस्तानचे स्वप्न भंगलं आणि भारताने बाजी मारली आहे.
नेमकं समीकरण काय होतं?
या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली होती. भारताने 252 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. मात्र, सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानसमोर एक मोठी अट होती. पाकिस्तानला भारताचा नेट रन रेट मागे टाकण्यासाठी हे 253 धावांचे लक्ष्य अवघ्या 33.3 षटकांत पूर्ण करायचे होते.
काय घडलं?
दरम्यान, जेव्हा 33.3 षटके संपली, तेव्हा पाकिस्तानला केवळ 165 धावांपर्यंत मजल मारता आली. या एका क्षणी पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपले आणि विजयाचा अधिकृत निकाल लागण्याआधीच भारताने सेमीफायनलचे तिकीट पक्के केले.
हेही वाचा - Australian Open 2026: टेनिस विश्वात नवा इतिहास; कार्लोस अल्काराझने जोकोविचला धूळ चारत जेतेपदावर कोरलं नाव
भारतीय फलंदाजांचा दमदार खेळ
बुलवायोच्या कठीण खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक असा संमिश्र खेळ केला. वेदांत त्रिवेदीने 98 चेंडूत 68 धावा करत भारतीय डावाला आकार दिला. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (30) आणि विहान मल्होत्रा यांनी 62 धावांची भागीदारी करून भक्कम पाया रचला. अखेरच्या षटकांत अंबरीश, कनिष्क आणि खिलान पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 250 धावांचा टप्पा ओलांडला.
पाकिस्तानवर गोलंदाजांचा दबाव
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्पा राखला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी धावा करण्याचा प्रयत्न केला, पण 33.3 षटकांची 'डेडलाईन' जवळ येताच त्यांच्यावरचा दबाव वाढत गेला. अखेर धावांची गती वाढवण्याच्या नादात पाकिस्तानचे गणित बिघडले आणि भारतीय टीममध्ये जल्लोष सुरू झाला. आता भारत अधिकृतपणे या विश्वचषकाच्या अंतिम 4 संघांत सामील झाला आहे.