मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध सुरू असताना, हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने 7 मे रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याच्या अवघ्या 3 दिवसांत शनिवारी किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला रामराम करणार का? अशी बातमी समोर येत आहे.
माहितीनुसार, रोहित शर्मांनी दिलेल्या निवृत्तीनंतर काही दिवसातच विराट कोहलीने बीसीसीआयला (BCCI) कळवले की, 'आपल्याला देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा आहे.' बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना निर्णय घेण्यापूर्वी यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा: भारत आणि पाकिस्तान तात्काळ युद्धबंदीसाठी तयार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
विराट कोहली कसोटी क्रिकेटला रामराम करणार?
इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. रोहित शर्मांच्या कसोटी निवृत्तीनंतर, अशी बातमी समोर आली आहे की विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटला रामराम म्हणू शकतो. 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
मात्र, तरीही विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने खेळत राहील. कोहलीप्रमाणेच रोहितनेही 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला रामराम म्हटले होते. अशा परिस्थितीत, रोहित आणि कोहलीची जोडी सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एकत्र खेळताना दिसेल, परंतु रोहितने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर किंग कोहली कधीही आश्चर्यकारक निर्णय घेताना दिसू शकतो.