ठाणे : इराण आणि इस्त्राईलदरम्यान सुरू असलेल्या युद्धाने संपूर्ण मध्यपूर्व भाग प्रभावित झाला आहे. अचानक पेटलेल्या या युद्धाचे पडसाद इतर देशांवरही पडल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच दुबईमध्ये अनेक भारतीय अडकून पडल्याचे समोर येत आहे. तर ठाण्यातील काही नागरिकदेखील दुबईमध्ये असल्याचे समोर येत आहे. या नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला असून ते सुखरूप असल्याची खात्री करून घेतली.
हेही वाचा : Crime News : फूस लावून तलावाजवळ नेलं, डोक्यात मागून वार, मित्रांनीच मित्राचा काटा काढला; पोस्टमार्टममुळे बिंग फुटलं
अमेरिका - इजरायल - इराणमध्ये सुरू झालेल्या मध्य पूर्वेतील तणावपूर्ण युद्धपरिस्थितीमुळे परदेशातील भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ठाणे जिल्ह्यातील तब्बल 26 पर्यटक सध्या दुबईमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील 23 आणि ठाणे शहरातील 3 नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूरमधील पर्यटक दुबईतील ग्रँड ऑस्ट्रिया हॉटेलमध्ये, तर ठाणे शहरातील पर्यटक हयात रिजन्सी हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांची अधिकृत यादी जाहीर केली असून, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील या पर्यटकांचा समावेश असल्याचे समोर झाले आहे.
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि प्रवास व्यवस्थेवर परिणाम झाल्याने अनेक पर्यटक विविध देशांमध्ये अडकले आहेत. दुबईमध्ये अडकलेल्या या नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दरम्यान, अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे तातडीने मदत आणि त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.