नवी दिल्ली: अमेरिका–इराण संघर्षात झालेल्या युद्धविरामावर भारताने पहिली अधिकृत प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केले आहे. जागतिक पातळीवरील तणाव कमी होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्रालयने बुधवारी (8 एप्रिल 2026) निवेदन जारी करत सांगितले की, या युद्धविरामामुळे पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा आहे. भारताने सुरुवातीपासूनच संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून तणाव कमी करण्याची भूमिका मांडली असल्याचेही मंत्रालयाने अधोरेखित केले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: Mumbai Sea Water: अथांग सागराचे खारे पाणी होणार गोड; मुंबईकरांची तहान आता समुद्र भागवणार, पाहा कसं असेल तंत्रज्ञान
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “सध्याचा संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी तणाव कमी करणे अत्यावश्यक आहे. संवाद आणि कूटनीती हाच या समस्येचा योग्य मार्ग आहे.” भारताने यापूर्वीही वारंवार शांततामय तोडगा काढण्यावर भर दिला होता.
या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात मानवी हानी झाली असून जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार साखळीवरही परिणाम झाला आहे, याकडेही मंत्रालयाने लक्ष वेधले. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या जलमार्गातून निर्बंधमुक्त आणि सुरक्षित व्यापार सुरू राहणे गरजेचे असल्याचे भारताने स्पष्ट केले.
एकूणच, भारताने युद्धविरामाचे स्वागत करताना शांतता, संवाद आणि स्थैर्य यांनाच प्राधान्य दिले असून, पुढील काळात या करारातून कायमस्वरूपी समाधानाचा मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा: NCP Banner Controversy: रायगडनंतर गोंदियातही बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब; प्रफुल पटेल म्हणाले, 'आता राहू द्या...'