इस्लामाबाद: जगाच्या नकाशावर सध्या शांततेची पांढरी कबूतरे नव्हे, तर युद्धाच्या घारी घिरट्या घालत आहेत. मध्य-पूर्वेतील रणकंदन आता केवळ इराण आणि इस्रायलपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे पडसाद थेट दक्षिण आशियाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत.
एका बाजूला अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असा 'आर या पार'चा संघर्ष सुरू असतानाच, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 'भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे' असा खळबळजनक दावा करून सीमेवरील तणावात भर घातली आहे. आखातात रात्रभरात बदललेल्या समीकरणांमुळे आता आशियाई राजकारणात 'धग' निर्माण झाली आहे.
सोमवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना झरदारी यांनी भारताला उद्देशून सावधगिरीचा इशारा दिला. "भारतीय नेतृत्व सध्या उघडपणे युद्धाची भाषा करत आहे, मात्र युद्धाने प्रश्न सुटत नाहीत तर ते गुंतागुंतीचे होतात," असे नमूद करत त्यांनी भारताला चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केले. पाकिस्तान नेहमीच प्रादेशिक शांततेचा पुरस्कर्ता राहिला असून, युद्धापेक्षा संवाद हाच एकमेव शाश्वत मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, 'भारताने युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडावे' असे म्हणतानाच झरदारी यांनी दक्षिण आशियातील सुरक्षा यंत्रणा धोक्यात आल्याची भीतीही व्यक्त केली आहे.
हेही वाचा: US Iran - Israel War: आखातात रात्रभरात काय घडलं? बहरीनने पाडली इराणची 70 क्षेपणास्त्रे, तर इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये 555 जणांचा मृत्यू; महायुद्धाची नांदी?
पाकिस्तानची डोकेदुखी केवळ पूर्वेकडील सीमेपुरती मर्यादित नाही, तर पश्चिमेला अफगाणिस्तानसोबतही त्यांचे 'शब्दांचे युद्ध' तीव्र झाले आहे. अफगाण भूमीवरून पाकिस्तानवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांबाबत झरदारी यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
"तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बीएलए सारख्या गटांना अफगाण भूमीवरून खतपाणी मिळत आहे, हे आता लपून राहिलेले नाही," असा आरोप त्यांनी केला. दोहा कराराचा भंग होत असल्याचे सांगतानाच, पाकिस्तानचा संयम आता संपला असून बाह्यशक्तींना देशाची शांतता भंग करू दिली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
सध्याची जागतिक स्थिती भरकटलेल्या दिशेने जात असल्याचे दिसते. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर इराणनेही अमेरिकी सैन्याच्या तळांवर प्रतिहल्ला चढवला आहे. या युद्धाच्या वणव्यात कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक पुरवठा साखळी होरपळणार आहेच, पण झरदारींच्या दाव्यानुसार जर दक्षिण आशियातही नवी आघाडी उघडली गेली, तर ते मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरेल.
थोडक्यात सांगायचे तर, आखातात रात्रभरात घडलेल्या घडामोडींनी जगाला एका नव्या शीतयुद्धाच्या किंवा कदाचित तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती एका बाजूला चर्चेची भाषा करत असले, तरी त्यांच्या विधानातील 'भारताच्या युद्धाची तयारी' हा दावा आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा ठरला आहे.
हेही वाचा: Ahilyanagar Crime News: ‘तू आमच्या बहिणीच्या गावात...’ फोन करून बोलावलं आणि तरुणावर जीवघेणा हल्ला; कोपरगावात खळबळ