गुजरातमधील सुरत शहराला हादरवून सोडणाऱ्या सामूहिक आत्महत्येप्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या वैभव रुंगटा याला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या तीन पानी सुसाइड नोट आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे ही कारवाई केली आहे.
सुरतच्या वेसू परिसरातील हॅपी एलिगन्स सोसायटीमध्ये राहणारे शेअर ट्रेडर बालमुकुंद खेतान, त्यांची पत्नी प्रियांका खेतान आणि नऊ वर्षांची मुलगी भाव्या खेतान यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेत दाम्पत्याची सात वर्षांची धाकटी मुलगी पथ्वी ही सुदैवाने बचावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी संध्याकाळी प्रियांका खेतान यांनी आपल्या वडिलांना, वस्त्रव्यवसायिक संजय अग्रवाल यांना फोन करून बालमुकुंद खेतान यांनी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती दिली होती. अग्रवाल तातडीने घटनास्थळी पोहोचले असता चारही कुटुंबीय बेशुद्ध अवस्थेत आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवांना माहिती दिल्यानंतर वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. बालमुकुंद खेतान यांना मृत घोषित करण्यात आले, तर प्रियांका आणि भाव्या यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा: Haldiram: 89 वर्षांच्या विश्वासाला तडा! हल्दीरामच्या गोदामात 112 किलो एक्सपायर्ड माल, तर 55 लाखांचा भेसळयुक्त साठा...
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये वैभव रुंगटा याच्याकडून दीर्घकाळ मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुसाइड नोटनुसार, रुंगटा याने खेतान यांचे क्रेडिट कार्ड वापरून कपडे, मोबाईल फोन आणि इतर वस्तू खरेदी केल्या तसेच रोख रक्कम काढल्याचा आरोप आहे. याशिवाय घेतलेली दुचाकी परत न दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पैसे आणि वाहन परत मागितल्यानंतर रुंगटा याने धमक्या दिल्याचा आरोप कुटुंबाने केला होता.
संजय अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वेसू पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे (Abetment to Suicide) आणि गुन्हेगारी धमकी (Criminal Intimidation) या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आणखी एक भावनिक बाब समोर आली असून खेतान यांनी सुसाइड नोटमध्ये पाळीव कुत्र्याच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत त्याच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याची विनंतीही केली होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपी वैभव रुंगटा हा पीडितांच्या घरी गेल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिस सध्या आरोपीची सखोल चौकशी करत असून आर्थिक व्यवहार, मानसिक छळ आणि इतर संभाव्य कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुरतमध्ये मोठी खळबळ उडाली असून आर्थिक आणि मानसिक दबावाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: Grampanchayat Sarpanch: राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका! मुदत संपलेल्या सरपंचांना 'प्रशासक' बनवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला 'ब्रेक'