नवी दिल्ली: एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे विमानाचे कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एअर इंडियाचे विमान AI-180 सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येत असताना अचानक विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने विमान कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आले, परंतु समस्या दुरुस्त करता आली नाही.
विमान मुंबईला पुढे जाऊ शकले नाही, म्हणून मंगळवारी सकाळी 5:20 वाजता विमानात घोषणा करून प्रवाशांना विमानातून उतरण्याचे निर्देश देण्यात आले. विमानाच्या कॅप्टनने प्रवाशांना सांगितले की त्यांना कोलकातामध्येच उतरवण्याचा निर्णय त्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतला जात आहे. त्यांना मुंबईला नेण्याची व्यवस्था एअरलाइन करेल.
हेही वाचा - एअर इंडियाच्या मागे लागली साडेसाती? विमानात पुन्हा बिघाड, रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले
गेल्या 24 तासांत अनेक उड्डाणांत तांत्रिक बिघाड -
दरम्यान, सोमवारी एअर इंडियाचे मुंबई ते अहमदाबाद विमान AI-2493 देखील रद्द करण्यात आले कारण एअरबस A321-211 (VT-PPL) उड्डाण करताना समस्या येत होत्या. तसेच दिल्ली-रांची एअर इंडिया एक्सप्रेस विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे विमानाला मधेच परतावे लागले.
हेही वाचा - अविश्वसनीय! अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
याशिवाय, सोमवारील हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या AI-315 विमानाला देखील मध्यंतरी हाँगकाँगला परतावे लागले. कारण फ्लाइटच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात तांत्रिक समस्या आली. अहमदाबाद विमान अपघातानंतर आता विमान कंपन्या सतर्क झाल्या असून उड्डाणाआधी विमानाची योग्य तपासणी करत आहेत.