नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या शालेय परीक्षांपैकी एक असलेल्या CBSE बोर्ड परीक्षा 2026 ला आजपासून अधिकृत प्रारंभ झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) नव्या परीक्षा आणि मूल्यमापन आराखड्याअंतर्गत यंदाची परीक्षा आयोजित केली असून, तब्बल 45 लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. भारतासह 26 देशांमधील 8,000 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
यंदापासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा नवा निर्णय अंमलात आला आहे. इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी एकूण 25,08,319 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत, तर इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी 18,59,551 विद्यार्थी बसणार आहेत. मंडळाने स्पष्ट केले आहे की, इयत्ता 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा देणे अनिवार्य आहे.
CBSE च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता 10 वीची पहिली फेरी 17 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान होणार आहे, तर इयत्ता 12 वीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. क्रीडा कोट्यातील विद्यार्थी, दहावीची दुसरी परीक्षा आणि पूरक (Supplementary) परीक्षा 15 जुलैपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. दोन्ही वर्गांच्या परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत होतील. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार सकाळी 10 वाजता बंद केले जातील. त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
हेही वाचा: RBI Credit Card Rules: बँका आता मनमानी करू शकणार नाहीत! क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी RBIचे नवे नियम जाहीर
प्रश्नपत्रिका सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी वितरित केली जाईल आणि विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वाचनकाल (Reading Time) दिला जाईल. पहिल्या दिवशी इयत्ता 10 वीचे विद्यार्थी गणित (स्टँडर्ड आणि बेसिक) विषयाची परीक्षा देणार आहेत, तर इयत्ता 12 वीचे विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, उद्योजकता, शॉर्टहँड (इंग्रजी व हिंदी) या विषयांना सामोरे जाणार आहेत.
एकूण उमेदवारांच्या संख्येकडे पाहता, 10 वी आणि 12 वी मिळून 43,67,870 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. 10 वीकरिता 83 विषयांसाठी 8,075 केंद्रांवर परीक्षा होणार आहे, तर 12 वीकरिता 120 विषयांसाठी 7,574 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मुलांची संख्या 14,08,546 (10 वी) आणि 10,27,552 (12 वी) इतकी असून, मुलींची संख्या अनुक्रमे 10,99,773 आणि 8,31,999 इतकी आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, प्रत्येक विषयाची परीक्षा झाल्यानंतर साधारण 10 दिवसांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू होईल आणि 12 दिवसांत पूर्ण केले जाईल. उदाहरणार्थ, जर 12 वीचा भौतिकशास्त्र (Physics) विषय 20 फेब्रुवारी 2026 रोजी असेल, तर त्याचे मूल्यमापन 3 मार्चपासून सुरू होऊन 15 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नव्या पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Raigad Fort Ropeway : शिवजयंतीनंतर रायगड किल्ल्यावरील रोप-वे सेवा बंद; आता होळीनंतरच रायगडावर रोप-वे जाणार