Friday, May 16, 2025 02:33:26 PM

कडक उन्हामुळे हैराण झालात? जाणून घ्या, उष्णतेचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि 'समर सॅड' म्हणजे काय?

उन्हाळ्यात दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तेजस्वी सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाच्या संपर्कात आल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे झोप पूर्ण होत नाही..

कडक उन्हामुळे हैराण झालात जाणून घ्या उष्णतेचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि समर सॅड म्हणजे काय

Effect Of Heat On Brain : अति उष्णतेचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर, मनावरही होतो. जर तुम्हाला या ऋतूत चिडचिड, थकवा किंवा नैराश्य वाटत असेल तर, ते सामान्य आहे. मेंदूतील काही विशिष्ट बदल यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उन्हाळा आला की, तापमानाचा पारा वाढतो आणि त्यासोबतच लाईफस्टाईलमध्ये अनेक बदल करावे लागतात. अनेकदा आपणा सर्वांना आपला मूडही बदलू लागल्याचे जाणवते. सामान्यतः लोकांना असे वाटते, की, फक्त हिवाळ्यातच अतिथंडी पडल्यास लोकांमध्ये घरातून बाहेर पडावेसे न वाटणे, पांघरूणात झोपून रहावेसे वाटणे अशा प्रकारचे नैराश्यासारखे वातावरण असते. परंतु, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अति उष्णतेचाही मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा - पपई न्याहारीमध्ये खाल्ल्याचे मोठे फायदे.. उन्हाळ्यात पचनक्रिया राहील ठणठणीत

जेव्हा तापमान सतत वाढत असते, तेव्हा ते शरीर आणि मन दोन्हीवर दबाव आणते. उन्हाळ्यात झोप व्यवस्थित न लागण्याचा त्रास, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे थकवा आणि सतत घाम येणे यामुळे शरीर थकते. पण खरा परिणाम मेंदूवर होतो - मूड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि नैराश्य ही याची सामान्य लक्षणे आहेत.

तज्ज्ञांच्या मते, या स्थितीला 'समर सॅडनेस' किंवा 'समर सॅड' असे म्हणतात. हा आजार नाही; तर, एक प्रकारची मानसिक प्रतिक्रिया आहे, जी अति उष्णतेशी आणि बाह्य वातावरणाशी संबंधित आहे. चांगली गोष्ट म्हणजे, ती समजून घेऊन आणि काही सोप्या उपायांचा अवलंब करून त्यावर मात करता येते.

अति उष्णतेमुळे मूड का बिघडतो?
उन्हाळ्यात दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तेजस्वी सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाच्या संपर्कात आल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि व्यक्तीला थकवा जाणवतो. याव्यतिरिक्त, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मेंदूला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे मूडवर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात चिडचिड, थकवा आणि आळस जास्त प्रमाणात आढळतो.

मेंदूमध्ये 'रासायनिक असंतुलन' कसे होते?
उन्हाळ्याच्या काळात आपल्या शरीराच्या हार्मोनल सिस्टीमवरही परिणाम होतो. विशेषतः, सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या 'फील गुड' हार्मोन्सची पातळी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, डिहायड्रेशन शरीराच्या इलेक्ट्रोलाइट संतुलनाला त्रास देते, ज्यामुळे न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम होतो. उन्हाळ्यात आपल्याला मनःस्थिती उदास, एकाग्रतेचा अभाव आणि अस्वस्थता जाणवण्याचे हेच कारण आहे.

हेही वाचा - उष्माघात होणं टाळायचंय? मग हे सोपे घरगुती उपाय करा; उन्हाळ्यात राहील थंडावा

सर्वात जास्त प्रभावित कोण आहेत?
उष्णतेचा सर्वांना सारखाच परिणाम होत नाही. पण जे आधीच ताण, चिंता किंवा नैराश्याने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा ऋतू आणखी कठीण असू शकतो. याशिवाय, वृद्ध, मुले आणि जास्त वेळ उन्हात राहणाऱ्यांमध्ये 'समर सॅडनेस'ची लक्षणे अधिक दिसून येतात.

हे टाळण्याचे सोपे मार्ग कोणते आहेत?
उन्हाळ्यात कोणत्या दृश्य कारणाशिवायच जाणवणाऱ्या उदासीनतेपासून वाचण्यासाठी, जीवनशैलीत छोटे बदल करणे खूप प्रभावी ठरू शकते. दिवसा पुरेसे पाणी पिणे, हलके आणि संतुलित जेवण घेणे, उन्हात बाहेर न पडणे किंवा कमीत कमी करणे आणि सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाणे यासारख्या सवयी मूड सुधारू शकतात. याशिवाय, खोली थंड आणि शांत ठेवणे आणि झोपेची पूर्ण काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

यातील तज्ज्ञाची मदत कधी घ्यावी?
जर तुम्हाला सतत निराशा वाटत असेल, लक्ष केंद्रित करता येत नसेल किंवा तुम्ही खूप थकलेले आणि चिडचिडे असाल, तर ते फक्त उष्णतेचा परिणाम असू शकत नाही. अशा परिस्थितीत, मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. वेळेवर मदत घेतल्यास, स्थिती बिघडण्यापासून रोखता येते आणि तुम्ही सामान्य जीवन जगू शकता.

(Disclaimer :  ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री