राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीकडे बहुमत असल्याने सहा जागांवर त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. त्यापैकी चार जागांसाठी भाजपने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देत पक्षाने अनुभवाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देत भाजपने आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील सात जागांपैकी चार भाजपकडे, एक शिंदेसेनेकडे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे चित्र आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. शिंदेसेनेचा उमेदवारही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. काही दिग्गज नेत्यांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांवर आणि आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महायुतीची रणनीती कितपत यशस्वी ठरते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.