Maharashtra Weather Alert: राज्यातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर झाल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी ढगांची गर्दी अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील सुमारे नऊ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. कापणीस तयार असलेली पिके पावसामुळे आडवी झाली, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने नुकसान वाढले. त्यामुळे नव्या इशाऱ्यामुळे शेतकरी वर्ग सतर्क झाला आहे.
हेही वाचा: Hingoli Farmers : "माझी विहीर चोरीला गेली", हिंगोलीतील धक्कादायक प्रकार समोर! तब्बल 80 शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला?
यंदाच्या हंगामात हवामानाचा लहरीपणा अधिक जाणवत आहे. डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागली असली, तरी जानेवारीच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने थंडीचा जोर कमी झाला. त्यानंतर तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. फेब्रुवारी महिन्यातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी अनुभवायला मिळत आहेत.
दरम्यान, काही भागात तापमानात मोठी तफावत दिसून आली आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तर ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या तापमानातील फरकामुळे नागरिकांना सकाळ-संध्याकाळ थंडी आणि दुपारी उकाडा अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव येत आहे.
फक्त पावसाच नव्हे, तर उन्हाच्या चटक्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Budget Session 2026: विधिमंडळात उद्यापासून सत्तासंघर्षाचा नवा अंक; महायुती विरुद्ध मविआ, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणाचे पारडे जड?
मुंबईसह काही शहरांमध्ये वायू प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने आरोग्यविषयक समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत.
राज्यासोबतच देशातील पंजाब, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच देशभर हवामानात अस्थिरता दिसून येत आहे.
सध्या तरी नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तर नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे. बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.