अमरावती: अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून, 14 वर्षांनंतर आजपासून अमरावती विमानतळावरून नियमित विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे भव्य लोकार्पण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांचीही उपस्थिती असणार आहे.
या प्रसंगी महायुतीचे अनेक नेतेमंडळी अमरावतीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत ते अमरावती विमानात शेजारी बसून एकत्र प्रवासाचा आनंद घेतला. त्याचबरोबर माजी खासदार नवनीत राणाही सोबत होत्या.
या लोकार्पणासाठी तीन हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 400 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
अमरावती विमानतळावरून 72 आसनी विमान आता मुंबई आणि अमरावती दरम्यान आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेणार आहे. या नवीन हवाई सेवा सुरू झाल्यामुळे विदर्भातील व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. विकासाच्या दृष्टीने ही सेवा अमरावतीच्या प्रगतीला गती देणारी ठरणार आहे.