Tuesday, February 17, 2026 08:45:59 PM

AC Local Time Table: घामाच्या धारा विसरा, आता गारेगार प्रवास करा; पाहा पश्चिम रेल्वेच्या नव्या एसी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक

मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी पश्चिम रेल्वेने 26 जानेवारी 2026 पासून 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ac local time table घामाच्या धारा विसरा आता गारेगार प्रवास करा पाहा पश्चिम रेल्वेच्या नव्या एसी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास आता अधिक सुखकर आणि गारेगार होणार आहे. वाढता उकाडा आणि गर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी हपापलेल्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने 'प्रजासत्ताक दिना'ची मोठी भेट दिली आहे. येत्या 26 जानेवारी 2026 पासून पश्चिम रेल्वेवर 12 नवीन वातानुकूलित (AC) लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना घामाच्या धारांऐवजी थंड हवेच्या झुळुकीचा आनंद घेत कामावर पोहोचता येणार आहे.

वाढत्या तापमानामुळे आणि रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे गेल्या काही काळापासून मुंबईकर एसी लोकलला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. प्रवाशांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विरार, बोरिवली, भाईंदर आणि गोरेगाव या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान नवीन सेवा सुरू करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर प्रत्येकी सहा फेऱ्यांचा समावेश असून, एकूण 12 नवीन फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात मोठी भर पडणार आहे.

विशेष म्हणजे, या 12 फेऱ्यांमध्ये 'फास्ट' आणि 'स्लो' अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांपासून ते रात्री उशिरा घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा विचार यात करण्यात आला आहे. यामुळे विरार-बोरिवली पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच तो आरामदायीही होणार आहे.

हेही वाचा: BMC Mayor: " या सोडतीचा आम्ही धिक्कार ... " मुंबई महापालिका आरक्षण प्रक्रियेत रोटेशनचे नियम धाब्यावर बसवल्याचा किशोरी पेडणेकर यांचा आरोप

मुंबईकरांसाठी आता या नवीन एसी लोकलमुळे अधिक सुसह्य होईल. रेल्वेने या फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, कोणत्या स्थानकावरून गाडी कधी सुटेल आणि चर्चगेटला कधी पोहोचेल, याची संपूर्ण माहिती प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या प्रवासाचे नवीन वेळापत्रक (26 जानेवारीपासून)

चर्चगेटच्या दिशेने (Up Line); सकाळी व दुपारचे सत्र

कामावर जाणाऱ्यांसाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्यांसाठी या फेऱ्या उपयुक्त ठरतील:

पहाटेची सुरुवात: सकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी गोरेगाववरून (स्लो) सुटणारी गाडी 6 वाजून 11 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल.

सकाळची ‘पीक अवर’ सेवा: सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी बोरिवलीवरून (फास्ट) सुटणारी गाडी 8 वाजून 20 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल.

विरारहून वेगवान प्रवास: सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी विरारवरून (फास्ट) सुटणारी गाडी 11 वाजून 27 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल.

दुपारची फेरी: दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी भाईंदरवरून (फास्ट) सुटणारी गाडी 13 वाजून 48 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल.

संध्याकाळची सुरुवात: दुपारी 15 वाजून 45 मिनिटांनी विरारवरून (स्लो) सुटणारी गाडी 17 वाजून 9 मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल.

रात्रीची शेवटची फेरी: संध्याकाळी 19 वाजून 6 मिनिटांनी गोरेगाववरून (स्लो) सुटणारी गाडी 20 वाजून 1 मिनिटाने चर्चगेटला पोहोचेल.

हेही वाचा: CRS Portal Scam : सरकारी पोर्टल हॅक करून घुसखोरांना भारतीय बनवण्याचा डाव? किरीट सोमय्यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

विरार/बोरिवलीच्या दिशेने (Down Line): परतीचा प्रवास

ऑफिसमधून घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी या फेऱ्यांचे नियोजन असे आहे:

सकाळची परतीची फेरी: सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी चर्चगेटवरून (स्लो) सुटणारी गाडी 7 वाजून 19 मिनिटांनी बोरिवलीला पोहोचेल.

विरारसाठी फास्ट: सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी चर्चगेटवरून (फास्ट) सुटणारी गाडी 9 वाजून 51 मिनिटांनी विरारला पोहोचेल.

भाईंदर विशेष: सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी चर्चगेटवरून (फास्ट) सुटणारी गाडी 12 वाजून 31 मिनिटांनी भाईंदरला पोहोचेल.

दुपारची विरार स्लो: दुपारी 13 वाजून 52 मिनिटांनी चर्चगेटवरून (स्लो) सुटणारी गाडी 15 वाजून 36 मिनिटांनी विरारला पोहोचेल.

संध्याकाळची गर्दी टाळण्यासाठी: संध्याकाळी 17 वाजून 57 मिनिटांनी चर्चगेटवरून (स्लो) सुटणारी गाडी 18 वाजून 51 मिनिटांनी गोरेगावला पोहोचेल.

रात्रीची शेवटची एसी गाडी: रात्री 20 वाजून 7 मिनिटांनी चर्चगेटवरून (स्लो) सुटणारी गाडी 21 वाजून 2 मिनिटांनी गोरेगावला पोहोचेल.

या नव्या एसी लोकल फेऱ्यांमुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी, वेळेची बचत करणारा आणि तणावमुक्त होणार आहे. वाढती गर्दी, उकाडा आणि प्रवासातील त्रास लक्षात घेता पश्चिम रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरणार असून, मुंबईच्या जीवनवाहिनीला आधुनिकतेची नवी झळाळी देणारा ठरेल.

हेही वाचा: Thorium Power Plant : महाराष्ट्रात देशातील पहिला 'थोरियम' वीज प्रकल्प! आता फक्त 'इतक्या' प्रति युनिटने मिळणार स्वस्त अन् सुरक्षित वीज


सम्बन्धित सामग्री