नागपूर : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक क्षेत्रातील आवड वेळोवेळी अधोरेखित होत असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून नागपूर येथील वर्धा जिल्ह्यातील 46 विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (The Indian Space Research Organisation, ISRO) भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री विज्ञान प्रदर्शनी योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळाली असून सध्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी बंगळूर येथील इस्रो केंद्राला भेट देत अंतराळ संशोधनाशी संबंधित विविध वैज्ञानिक बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सॅटेलाइट लॉन्चिंग प्रक्रिया कशी पार पडते, उपग्रह अंतराळात पाठवताना कोणत्या तांत्रिक पद्धती वापरल्या जातात तसेच अंतराळ विज्ञानाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून देण्यात आली.
हेही वाचा: Donald Trump : 'तुम्ही लढलात तर 200 टक्के कर लावणार', ट्रम्पचा इशारा; भारत-पाकिस्तान 'युद्धविरामा'चाही पुनरोच्चार
विद्यार्थी निर्मित याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही बंगळूर येथील इस्रो सेंटरला भेट दिली तसेच अगस्त (Agastya) विज्ञान केंद्रालाही भेट दिली. सॅटेलाइट लॉन्चिंग दरम्यान कोणते नियम पाळले जातात, कोणत्या प्रकारचे इंधन वापरले जाते याबाबत सविस्तर माहिती मिळाली. याशिवाय बॉटनिकल गार्डनला भेट देताना विविध वनस्पती आणि झाडांची माहिती मिळाली. त्यामुळे आमच्या ज्ञानात मोठी भर पडली.”
एका विद्यार्थिनीने सांगितले की, “या शैक्षणिक दौऱ्यामुळे आमच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाली. मी आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास केला. इस्रोच्या विविध सॅटेलाइट मोहिमा, विशेषतः गगनयान आणि इतर अंतराळ मोहिमांबाबत अधिकृत माहिती मिळाल्याने विज्ञानाविषयीची उत्सुकता अधिक वाढली.” या संपूर्ण घडामोडींची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी दिली आहे.
या यशाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंब्यामुळेच ही संधी मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा वैज्ञानिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, संशोधनाची आवड आणि कार्यक्षमतेत वाढ होत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: Maharashtra Board Exams: लगे रहो! दहावीच्या परीक्षेचा आज 'श्रीगणेशा'; 16 लाख विद्यार्थ्यांची कसोटी पणाला लागणार