सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील एका निर्जन जंगलात शुक्रवारी सकाळी घडलेली घटना स्थानिकांना चकित करून गेली. शिकारीसाठी गेलेला सचिन सुभाष मर्गज (वय 28) हा तरुण अचानक गोळी लागून मृत अवस्थेत आढळला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही गोळी त्याच्यासोबत शिकारीला गेलेल्या साथीदाराकडूनच चुकून सुटली असावी, मात्र संपूर्ण घटनेभोवती संशयाचे धुके दाटून बसले आहे.
सकाळी सुमारे साडे नऊ ते अकरा वाजता जंगलातील शांतता अचानक एका भीषण किंकाळीने भेदली, “आई गं…!” या आवाजानंतर काही पक्षी आकाशात उडाले आणि काही क्षणांतच एक तरुण रक्तात माखलेला जमिनीवर कोसळलेला दिसला. हा क्षण नेमका कसा घडला? गोळी नेमकी कोणी आणि का झाडली? याची उत्तरे शोधताना पोलिसांची चक्रे वेगाने फिरू लागली. शिकारीसोबत गेलेल्या सिप्रियान अॅन्थॉनी डान्टस (वय 35) या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गोळी झाडल्याची कबुली दिली असली तरी परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली, हे तो स्पष्टपणे सांगू शकत नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. जंगलातील झुडपामध्ये ‘हालचाल दिसल्याने’ त्याने गोळी झाडल्याचा दावा केला आहे. पण ती हालचाल करणारे प्राणी होते की काहीतरी वेगळं…? त्या क्षणी सचिन तिथे का आणि कसा पोहोचला? हे अनुत्तरित प्रश्न तपासाला नवी दिशा देत आहेत.
हेही वाचा: Beed Teachers Suspended: बीडमध्ये शिक्षण विभागाची धडक कारवाई; 14 शिक्षक निलंबित, कारण काय?
घटनास्थळावर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने पंचनामा करताना काही महत्त्वाचे नमुने जप्त केले. सचिनच्या शरीराच्या चेहरा आणि छातीवर अनेक छर्रे आढळले, ज्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक तपासात नमूद केले. मात्र गोळी कोणत्या अंतरावरून झाडली गेली आणि त्या क्षणी दोघांची नेमकी स्थिती काय होती, याचा तपास महत्त्वाचा मानला जात आहे. सचिनचे वडील सुभाष मर्गज यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गावात शोककळा पसरली. सचिन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, गरीब कुटुंबाचा आधारस्तंभ आणि व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता.
कामानिमित्त सांगेली येथे राहताना त्याची सिप्रियानशी ओळख झाली होती. या ‘शिकार मोहिमे’चं निमित्त खरं तर काय होतं? दोघे त्या दिवशी नेमके कुठे आणि कशासाठी गेले होते? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अस्पष्ट आहेत. सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. उशिरापर्यंत चौकशी सुरू होती आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती.
तपास पथकाने जंगलातील रक्ताचे नमुने, गोळीचे अंश, पावलांचे ठसे आणि इतर शंका निर्माण करणारे सर्व पुरावे ताब्यात घेतले आहेत. ही घटना अपघात होता की बेपर्वाई? किंवा काहीतरी अधिक गूढ…? पोलिसांचा पुढील तपासच सत्य समोर आणेल. मात्र एका कुटुंबाचा आधार गमावल्याने वेर्ले आणि सांगेली परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण सावंतवाडीच्या या जंगलातील ‘शिकार’ प्रकरणामागील संपूर्ण सत्य बाहेर येण्याची वाट पाहत आहेत.
हेही वाचा: IndiGo Flight Service: एअरलाईनच्या CEO कडून माफीनामा; सेवा सुरळीत होण्याबद्दल अंदाज व्यक्त