Jayant Patil : विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकारच्या धोरणांचा आरसा असतो, मात्र या आरशात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल एक चकार शब्दही नसणे, हे धक्कादायक आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
मंत्रिमंडळाच्या विस्मरणशक्तीवर प्रश्नचिन्ह
जयंत पाटील म्हणाले की, 'अभिभाषण मंत्रिमंडळच तयार करते. अशावेळी किमान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तरी आपल्या नेत्याबद्दल दोन ओळी असाव्यात, असा आग्रह धरायला हवा होता. राज्यपालांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे अपेक्षित होते, मात्र सरकारने त्यांना पूर्णपणे डावलले. मुख्यमंत्र्यांनी किमान अर्थसंकल्पात तरी त्यांची दखल घ्यावी,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहिल्यादेवींचा अपमान आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा
सरकार महापुरुषांची नावे केवळ भाषणात वापरते, पण कृती शून्य आहे, असा आरोप करत त्यांनी वाराणसीतील घटनेचा दाखला दिला. उत्तर प्रदेशातील मणिकर्णिका घाटावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ऐतिहासिक भाग आणि मूर्तींचा विध्वंस केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 'ज्या अहिल्यादेवींचा देशाला अभिमान आहे, त्यांनी बांधलेला घाट पाडण्याचे धाडस योगी सरकार करत असेल, तर त्याचा निषेध झालाच पाहिजे. तो घाट पुन्हा जसाच्या तसा बांधून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी,' असे जयंत पाटील ठणकावून म्हणाले.
हेही वाचा - Rohit Pawar: “एफआयआर का घेतली जात नाही?” अजित पवार निधन प्रकरणावर रोहित पवार आक्रमक
आदिवासी निधी आणि सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना टोले
दरम्यान जयंत पाटील यांनी इतरही अनेक गंभीर विषयांवर सरकारला घेरले. बिरसा मुंडांचे नाव घेणारे सरकार आदिवासी विभागाचा निधी इतर विभागांकडे वळवून त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जयंत पाटील यांनी म्हटलं की, सीमाप्रश्नावर दरवर्षी केवळ औपचारिकता म्हणून भाष्य केले जाते. मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत. पक्ष कसे फोडायचे आणि कायद्याचा किस कसा काढायचा हे त्यांना चांगले ठाऊक आहे. याच बुद्धीचा वापर त्यांनी सीमाप्रश्नासाठी केला, तर महाराष्ट्राला आणि सीमाबांधवांना नक्कीच न्याय मिळेल,' असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.