Mumbai Water Cut: मुंबई महानगरपालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात येणार असल्याने, मुंबईतील अनेक भागांना आगामी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पालिकेच्या 'पिसे' येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम'च्या वार्षिक देखभालीमुळे 27 जानेवारीपासून पाणीकपात लागू केली जाणार आहे.
पाणीकपातीचा कालावधी
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हे परिरक्षणाचे काम मंगळवार, 27 जानेवारी 2026 पासून शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल. या 12 दिवसांच्या काळात प्रभावित क्षेत्रांमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Mumbai Local Trains: मेल-एक्सप्रेसला 'रेड कार्पेट' आणि लोकल प्रवाशांना 'वेळकाढूपणा'; प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळाली उडवाउडवीची उत्तरं, काय घडलंय नेमकं?
कोणत्या विभागांवर परिणाम होणार?
पालिकेने जाहीर केल्यानुसार खालील विभागांचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील:
1. शहर विभाग -
'ए' विभाग: नेव्हल डॉकयार्ड परिसर.
'बी' आणि 'ई' विभाग: संपूर्ण भाग.
'सी' विभाग: भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला आणि घोगरी मोहल्ला.
'एफ दक्षिण' व 'एफ उत्तर' विभाग: संपूर्ण भाग.
2. पूर्व उपनगरे (Eastern Suburbs):
'टी' विभाग: संपूर्ण मुलुंड (पूर्व आणि पश्चिम).
'एस' विभाग: भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व).
'एन' विभाग: विक्रोळी आणि संपूर्ण घाटकोपर.
'एल' विभाग: कुर्ला (पूर्व).
'एम पूर्व' आणि 'एम पश्चिम' विभाग: चेंबूर, गोवंडी, मानखुर्दसह संपूर्ण विभाग. तथापी, मुंबईबाहेरील ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका हद्दीतील ज्या भागांना मुंबई महापालिकेकडून पाणी दिले जाते, तिथेही 10 टक्के कपात लागू असेल.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, यंत्रणेच्या वार्षिक देखभालीचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, मुंबईकरांनी आगाऊ पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.