किरण गोटूर. प्रतिनिधी. नाशिक: लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीवरून आरोप - प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहे. 'मतांसाठी राज्याच्या तिजोरीची लूट केली गेली', शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे. 'अजित पवार यांनी अर्थखात्याचा राजीनामा द्यावा' असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. 'आधीच योग्य छानणीची गरजेची होती', अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खासदार संजय राऊत?
'अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अर्थखात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे कोणी लुटले? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले. लाडक्या बहिणींनी नाही, तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे, शेकडो कोटी रुपयांचा. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतली आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्हाला मतं पाहिजे आणि अर्थखात्याच्या माध्यमातून ही लूट झालेली आहे. याचं प्रायश्चित कोणी केलं पाहिजे?' असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: धुळे जिल्ह्यात कृषी विभागाची बोगस बियाणांवर मोठी कारवाई
लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने केली छानणी करण्यास सुरुवात:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छानणी करण्यास सुरुवात केली आहे. निकषात न बसणाऱ्या आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. आता राज्य सरकारकडून लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून आयकर विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 'येत्या दहा दिवसांत अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या योजनेतील खरे लाभार्थी निश्चित होतील. जर या तपासणीत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचे आढळून आले, तर मोठ्या प्रमाणात लाडकी बहिण या योजनेतून बाद ठरण्याची शक्यता आहे', अशी माहिती राज्यातील महिला बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महायुती सरकारच्या गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजेारीवर आर्थिक ताण पडत आहे. या योजनेत सुमारे 2 कोटी 65 लाख लाभार्थी महिलांनी नेांदणी केली होती. त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. एप्रिलपर्यंत 9 हप्ते म्हणजेच 13 हजार 500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मे महिन्याचा लाभ अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. योजनेच्या अटींनुसार महिला बाल विभागाकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे. या तपासणीत आतापर्यंत राज्यातील 11 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदिवासी विभागाचे बजेट वळते केले असले तरी राज्यातील बहिणींना मे महिन्यांचा लाभ जून महिना उजडला तरीही मिळलेला नाही. त्यामुळे 1500 रुपये कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे.
योग्य लाभार्थी महिलांनाच लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील:
लाभार्थींची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थींनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2289 सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद केला आहे', अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा: पाकिस्तानात गेलेल्या नागपुरमधील सुनीता जामदाडे न्यायालयात हजर
इतक्या महिला अपात्र:
2 लाख 30 हजार : राज्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला.
1 लाख 10 हजार : 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला आढळल्याने झाल्या अपात्र
1 लाख 60 हजार : चारचाकी वाहने असलेल्या महिलाही झाल्या योजनेतून बाद
7 लाख 70 हजार : नमो शेतकरी योजनेच्या महिला ठरल्या अपात्र
2652 : सरकारी नोकरीतील महिला.
लाभार्थी महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. उत्पन्न मर्यादेची अट योग्य रीतीने पाळली जात आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यासाठी राज्यातील अर्थ विभागाने केंद्र सरकारकडे आयकर विभागाकडून या लाभार्थींची उत्पन्न पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या आयटीआरची छानणी होणार आहे. या अहवालानंतर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.