शुभम उमले, प्रतिनिधी, मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना केक न कापण्याचे, फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक
त्याऐवजी, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे तसेच राज्यात 'तिरंगा रॅली' काढण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 'या 'तिरंगा रॅली'चा मुख्य उद्देश भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवणे आहे', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यादरम्यान, 'तिरंगा रॅली'मध्ये 'भारत झिंदाबाद' अशा घोषणा देण्याची सूचना त्यांनी दिली आहे.
हेही वाचा: 'महिलांच्या सैन्य भरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता'; शरद पवारांनी सांगितला संरक्षण मंत्री असतानाचा किस्सा
10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला जातो. राज्यभरात हा दिवस 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भारतीय सैन्य आणि शहीद जवानांविषयी असलेल्या आदराचे आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.